आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांवर गुरुवारी एक एप्रिलला मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बंगालबहुल बराक खोऱ्यातील १५ जागा कोणत्याही पक्षासाठी सरकार स्थापनेच्या दृष्टीने निर्णायक ठरतील. त्यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी सत्ताधारी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी मतदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी मोठमोठी आश्वासनेदेखील देण्यात आली.
ब्रह्मपुत्र खोऱ्यातील लोकांनी सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला कडवा विरोध केला होता. अगदी त्याच्या विरुद्ध म्हणजे बराक खोऱ्यातील हिंदू बंगाली समुदायाने या कायद्याचे जोरदार समर्थन केले होते. बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांत एकूण १५ मतदारसंघ आहेत. भाजपने २०१६ च्या निवडणुकीत येथील ८ जागी विजय मिळवला होता. परंतु यंदा हिंदू बंगाली मतदारांमध्ये भाजपबद्दल नाराजी दिसून येत आहे. कारण आतापर्यंत सीएए लागू करत नसल्यामुळे या समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे.
ऑल आसाम बंगाली यूथ स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष दीपक डे म्हणाले, हिंदू बंगाली बहुल जागांवर यंदाच्या निवडणुकीत नागरिकत्वाचा मुद्दा सर्वात मोठा आहे. सीएए अातापर्यंत लागू केले नसल्याने हिंदू बंगाली या वेळी संभ्रमावस्थेत आहेत. २०१६ च्या निवडणुकीत भाजपने आम्हाला आश्वासन दिले होते. भाजप सरकार सत्तेवर आल्यास हिंदू लोकांना डी व्होटरच्या नावाने तपासणी छावण्यांत पाठवले जाणार नाही. त्यांच्यावर अत्याचार हाेणार नाही. परंतु आमच्या अडचणी कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली आहे. राज्यात एनआरसीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. त्यात १९ लाख लोकांची नावे नाहीत. त्यात सर्वाधिक हिंदू बंगाली आहेत.
राज्यातील वरिष्ठ पत्रकार व न्यूज वेबसाइट नॉर्थ ईस्ट नाऊचे मुख्य संपादक अनिर्बान रॉय म्हणाले, आसाममध्ये भाजपचा जन्म बराक खोऱ्यात झाला होता. तेव्हा आसाममधील लोक नीटपणे भाजपला आेळखतही नव्हते. तेव्हा भाजपला १५ पैकी १० जागा मिळाल्या होत्या. बंगाली हिंदूंनी भाजपचा विजय व्हावा यासाठी पाठिंबा दिला. परंतु आसाममध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नागरिकत्वाच्या मुद्द्यावरील पक्षाच्या भूमिकेवर आता हिंदू बंगाली लोकांना शंका येत आहे. म्हणूनच भाजपसाठी यंदाची निवडणूक कठीण आहे.
येथे सुमारे ७५ लाख हिंदू बंगाली, निर्णायक भूमिका
२०११ च्या जनगणनेनुसार आसामची एकूण लोकसंख्या ३ कोटी ११ लाख आहे. त्यात २४ टक्के हिंदू बंगाली आहेत. म्हणजेच राज्यात सुमारे ७५ लाख हिंदू बंगाली आहेत. म्हणूनच कोणत्याही राजकीय पक्षाला सत्ता स्थापनेसाठी या मतदारांचे समर्थन गरजेचे असते. आता या भागात नागरिकत्व मुद्दा सर्वात मोठा ठरला आहे. राज्यात सीएए लवकरात लवकर लागू व्हावा, असे या घटकाला वाटते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.