आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'13 तास झाले. कुणीही शोधण्यास आले नाही. देव मुलींना जन्मालाच का घालतो? या पृथ्वीवर मुली आई-वडिलांच्या डोक्यावरचे ओझे बनल्यात. आता मी जात आहे.' हे अंतिम शब्द आहेत बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात शाळेत आत्महत्या केलेल्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीचे. या कोवळ्या कळीने गत मंगळवारी आत्महत्या केली. तिच्या नोटबूकमध्ये आढळलेली सुसाइड नोटमधील हे शब्द वाचून अवघी पंचक्रोशी हळहळली.
वीरपूरच्या एका माध्यमिक विद्यालयात 1 डिसेंबर रोजी इयत्ता 8वीच्या करीनाचा मृतदेह वर्गात ओढणीने गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थिनीने फळ्यावर आपले नाव व I AM SORRY व देवा माझे व माझ्या कुटुंबीयांचे संरक्षण कर, असे लिहिले होते.
करीनाच्या शेवटच्या पत्रात 13 तास लोटल्याच्या उल्लेखासह शाळा बंद झाल्याचा व बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याचा उल्लेख आहे. त्यावरून करीनाने रागाच्या भरात वर्गात राहिल्याचा व वर्ग बंद करताना कुणीही आतमध्ये पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले. अंदाजानुसार, करीनाने 13 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास करीनाने गळफास घेतला.
पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या पुरावे व जबाबांनुसार करीनाने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. तसेच सुसाइड नोटमधील हँड रायटिंगची तज्ज्ञांमार्फतही चौकशी केली जात आहेत. एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी शाळेतील शिक्षकांचीही चौकशी केली जात आहे.
सुसाइड नोटमध्ये काय?
करीना आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हणाली - देवा माझ्या घरच्यांना आनंदी ठेव. मला माफ करा. आज घरी जाण्याचे खूप मन होते. पण शाळा बंद झाली. बाहेर जाण्याचा मार्गही नाही. विचार केला की, सकाळी घरी जाऊ. पण लोक थट्टा करतील. गावकऱ्यांनो माफ करा. मी आजपर्यंत एकही चूक केली नाही. पण आज खूप मोठे पाप करण्यास जात आहे.
करीनाचा घरी छळ सुरू होता का?
करीना पुढे म्हणाली - आता मम्मी-पप्पा खूप खूश होतील. कारण, ते मला नेहमीच डोळ्यापुढून दूर जा असे म्हणत होते. चला, आज मी सर्वांच्या डोळ्यांपासून दूर जात आहे. आज मी घरी न दिसल्यामुळे आई किती आनंदी होईल. देव मुलींना जन्मालाच का घालतो. या पृथ्वीवर मुली आई-वडिलांसाठी ओझे बनतात.
आजपर्यंत मी एकही चूक केली नाही. त्यानंतरही आई मला शिवीगाळ करत होती. पण मी कधीच तिला उलटून उत्तर दिले नाही. स्वतः उपाशी राहिले. पण आईला अवश्य जेऊ घालत होते. आज त्याच आईने माझ्यासोबत चुकीची वागली. ती मला लग्न करण्याची भीती घालत होती. माझी लग्न करण्याची इच्छा नव्हती.
कुणी दिले होते वचन?
करीनाने आपल्या शेवटच्या पत्रात लिहिले आहे की, एका माणसाने मला माझ्यापूर्वी हे जग सोडण्याचे वचन दिले होते. आज पाहते तो खरे बोलत होता, की खोटे.
7 जणांविरोधात FIR
वीरपूर पोलिसांनी करीनाच्या आईच्या जबाबानुसार, हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये शाळेच्या शिक्षिका क्षमा कुमारी, गार्ड अमित कुमार सिंह यांच्यासह 7 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी योगेंद्र यांनी करीनाचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या हे ठरवण्यासाठी पोलिसांना एफएसएल व शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे.
नागरिकांची शिक्षकांना मारहाण
मंगळवारी विद्यार्थिनीचा मृतदेह मिळाल्यानंतर कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी शाळेत मोठा गोंधळ घातला. त्यांनी शिक्षकांना बंधक बनवून मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर शिक्षकांची सुटका झाली. यावेळी ग्रामस्थांनी शाळेत मोठी तोडफोड केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.