आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराWFI अध्यक्ष बृजभूषण यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बंद करण्यात आली. न्यायालयाने म्हटले की, महिला कुस्तीपटूंना संरक्षण देण्यात आले आहे. बृजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची त्यांची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे. आता अन्य काही समस्या असल्यास याचिकाकर्ते उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतात.
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांत हाणामारी झाली. त्याच गडबडीत कोर्टाने हा निर्णय दिला. जंतरमंतर येथे रात्री उशिरा झालेल्या संघर्षात कुस्तीपटू राकेश यादव आणि विनेश फोगाटचा भाऊ दुष्यंत जखमी झाला. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की कुस्तीपटूला दुखापत झाली नाही, 4 पोलिस जखमी झाले आहेत.
सलग 12 दिवसापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी गुरूवारी सांगितले की, ते सर्व पदके भारत सरकारला परत करणार आहेत. महावीर फोगाट यांनीही त्यांचा द्रोणाचार्य पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले.
कुस्तीपटूंना भेटण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल, शेतकरी आणि खाप नेते पोहोचले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नवज्योत सिंग सिद्धू आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे.
बुधवारी रात्री झालेल्या झटापटीचा आतापर्यंतचा घटनाक्रम वाचा...
बुधवारी रात्री 10:45 वा.: पावसामुळे अंथरुन व रस्ते ओले झाल्यामुळे कुस्तीपटू पलंग घेऊन मैदानावर पोहोचल्याने वाद सुरू झाला. आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती हेही पलंग घेऊन पोहोचले. पोलिसांनी पैलवान व भारती यांना रोखले असता वादाला सुरुवात झाली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण पैलवान संतापले. किरकोळ झटापट झाली. भारती यांच्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री 11:45 वा.: या घटनेचा व्हिडिओ व फोटोही समोर आलेत. पैलवानांनी सांगितले की, आम्ही केवळ पलंग घेऊन जात होतो. पोलिसांनी अचानक आमच्यावर हल्ला केला. अनेक पोलिस मद्यधुंद स्थितीत होते. त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. कुस्तीपटूंनी एका पोलिसालाही पकडले. तो नशेत गैरवर्तन करत असल्याचा आरोप आहे. विनेशने सांगितले की, तिचा भाऊ दुष्यंतच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दुसरा पैलवान राकेशही जखमी झाला आहे.
बुधवारी रात्री 12:30 वा.: वादानंतर कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेतली. कुस्तीपटू संगीता फोगाट व साक्षी मलिकला अश्रू अनावर झाले. त्यांनी हात जोडून मदतीची विनंती केली. विनेशने सांगितले की, ती बेड घेण्यासाठी जात होती. तेव्हा पोलिस कर्मचाऱ्याने तिच्याशी गैरवर्तन केले. विनेश रडत म्हणाली - हा दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी पदक जिंकले होते का? बृभूषण शांतपणे झोपलेत. येथे आमच्यावर लाठोमार सुरू आहे.
बुधवारी रात्री 01:00 वा.: बजरंग पुनिया म्हणाला की, या आपल्या देशाच्या माता-भगिणी आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. सर्वांनी जंतरमंतरवर पोहोचावे. अन्यथा येथे कुणीही वाचणार नाही.
बुधवारी रात्री 2:00 वा.: बजरंग पुनियाने आणखी एक व्हिडिओ जारी केला. त्यात त्याने पोलिस दिसेल त्याला ताब्यात घेत असल्याचे नमूद करत आंदोलन स्थळी न येण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की, आम्हाला मुद्यापासून भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही कुणाशीही वाद करणार नाही. तसेच मुद्याही सोडणार नाही.
गुरुवारी सकाळी 7.30 वा.: स्वाती मालीवाल जंतरमंतरवर पोहोचल्या. त्यांनी विनेश, साक्षी व इतर महिला कुस्तीपटूंशी चर्चा केली. हरियाणाच्या गावातील शेतकरी व खाप नेत्यांनीही जंतरमंतरकडे मोर्चा वळवला. प्रियांका गांधी, अरविंद केजरीवाल यांनी समर्थनार्थ विधाने केली. प्रियांका गांधी म्हणाल्या- महिला कुस्तीपटूंचे अश्रू पाहून वाईट वाटले. त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
गुरुवारी सकाळी 8.45 वा.: कुस्तीपटूंचे पत्र व्हायरल; विनेश फोगाट म्हणाली - आम्ही कोणतेही पत्र लिहिले नाही
सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. त्यात बजरंग पुनियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या खेळाडूंच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे त्याने लिहिले आहे. पण विनेशसह इतर अनेक पैलवानांनी असे कोणतेही पत्र लिहिले नसल्याचे स्पष्ट केले.
गुरुवारी सकाळी 11 वा.: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल आंदोलकांना भेटण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचल्या. त्यांनी येथील सर्व पैलवानांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, रात्री 1.30 वा. त्या जंतरमंतरवर आल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना आंदोलकांना भेटू दिले नाही. त्यांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांना अनेक तास तिथे बसवून ठेवल्यानंतर पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवर येण्यास मज्जाव केला.
गुरुवारी सकाळी 11:10 वा.: सकाळी 10:30 च्या सुमारास जिंदमधील शेतकऱ्यांनी पैलवानांच्या समर्थनार्थ दिल्लीच्या दिशेने कूच केली. पण, पोलिसांनी त्यांना सकाळी 11 वा. कुंडली येथील केजीपी-केएमपी झिरो पॉइंटजवळ रोखले. हे शेतकरी संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) सदस्य अभिमन्यू कुहाड यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते.
महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ केल्यानंतर वाद सुरू
साक्षी मलिकचे पती सत्यव्रत मलिक यांनी फेसबुक लाईव्ह केले. त्यात ते म्हणाले की - रात्री 10.45 च्या सुमारास विनेश बहिण संगीतासोबत काही अंतरावर झोपण्यास जात होती. तेव्हा तिथे दारूच्या नशेत असलेल्या एका पोलिसाने त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना चिखलात जाऊन झोपण्यास सांगितले. यावेळी पोलिस-पैलवानांत वादावादी सुरू झाली.
विनेशच्या भावासह इतर कुस्तीपटू त्यांच्या मदतीला पोहोचले. त्यात पोलिसांनी विनेशच्या भावाच्या डोक्यात काठीने वार केला. विरोध एवढा वाढला की, दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी कुस्तीपटूंनी भारत माता की जय वंदे मातरम व इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
बजरंग म्हणाला - आम्ही आमची पदके सरकारला परत करू
कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला - "आम्ही जिंकलेली पदके भारत सरकारला परत करू. देशाचे नाव कमावल्यानंतरही आम्हाला अशी वागणूक दिली जात असेल, तर आम्हाला ही पदके नकोत. दिल्ली पोलिस व बृजभूषण यांना आमचे आंदोलन उधळवून लावायचे आहे. आमच्या आंदोलनाला कधी जातीयवादी, तर कधी प्रादेशिकवादी ठरवले जात आहे."
कोण काय म्हणाले...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.