आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मागील 24 तासांत कोरोनाचे नवे 3945 रुग्ण आढळले. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या औषध महानियंत्रकांनी (DCGI) कोर्बेव्हॅक्स (CORBEVAX)लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेणाऱ्या 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना आपत्कालीन स्थितीत कोर्बेव्हॅक्सचा बूस्टर डोस घेता येईल. हैदराबाद स्थित बायोलॉजिकल ई. (बीई) कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे.
5 राज्यांत निगराणीची गरज
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 3 जून रोजी राज्यांना एक पत्र पाठवले. त्यात महाराष्ट्रासह तेलंगणा, केरळ, कर्नाटक व तामिळनाडूतील वाढत्या रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. मंत्रालयाने यासंबंधी कठोर निगराणीसह पूर्वीसारखी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
विमान प्रवाशांसाठी मास्क अनिवार्य
दिल्ली हाय कोर्टाने विमान प्रवाशांसाठी मास्कसह सर्वच कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिलेत. नियमांची अवहेलना करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हे दाखल करा, दंड ठोठावा. एवढेच नाही तर त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश करा, असे कोर्टाने म्हटले आहे.
दिल्लीत कोरोना नियंत्रणात
दिल्लीत शुक्रवारी कोरोनाचे नवे 345 रुग्ण आढळले. तर 389 जण बरे झाले. चांगली गोष्ट म्हणजे राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. येथे सध्या 1446 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत 19 लाख 7 हजार 982 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 26 हजार 212 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील संसर्ग दर 8 टक्क्यांहून अधिक
महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वच लाटांत सर्वाधिक रुग्ण आढळले. यावेळीही राज्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे काळजी वाढली आहे. यावेळी राज्याचा साप्ताहिक संसर्ग दर 8 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे दर 100 टेस्टमागे 8 जण संक्रमित आढळत आहेत. राजधानी मुंबईत एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात रुग्णालयात दाखल होण्याचा दर 231 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
राज्याच्या आरोग्य खात्याच्या माहितीनुसार शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 1134 नवे रुग्ण आढळले. तर 563 रुग्ण बरे झाले व 3 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 5127 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 78 लाख 90 हजार 346 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 77 लाख 37 हजार 355 जणांनी त्यावर मात केली आहे. महाराष्ट्रात 1 लाख 47 हजार 864 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.