आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागेश्वर धामचे पीठीधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग उर्फ सौरव याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याच्या सुटकेचे आदेश दिले. पोलिसांनी शालिग्रामला आजच अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. पोलिसांनी कोर्टाला शालिग्रामच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी शालिग्रामला जामीन मंजूर केला.
शालिग्राम उर्फ सौरव गर्गवर पोलिसांनी 9 दिवसांपूर्वी FIR दाखल केला होता. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो सिगारेट ओढत लग्न सोहळ्यातील वऱ्हाड्यांना धमकावताना दिसून येत होता. पोलिसांनी त्याच्यावर एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शालिग्राम गर्ग यांचा लग्न सोहळ्यातील लोकांना धमकावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारावर शालिग्रामवर मारहाण, धमकावणे, जिवे मारण्याची धमकी देणे व संपत्तीचे नुकसान करण्यासह एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास एसडीपीओ खतुराहो यांना सोपवण्यात आला होता. कुटुंबीयांच्या जबाबाच्या आदारावर या प्रकरणी आर्म्स अॅक्टचे कलमही लावण्यात आले होते. या प्रकरणी गुरुवारी मुख्य आरोपी शालिग्राम गर्ग व राजाराम तिवारी यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
जाणून घ्या काय आहे प्रकरण
छतरपूर जिल्ह्याच्या गढा गावात 11 फेब्रुवारी रोजी अहिरवार समाजाच्या एका कुटुंबातील मुलीचे लग्न होते. कुटुंबाने या प्रकरणी प्रथम बागेश्वर धामच्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्यासाठी अर्ज केला होता. पण नंतर त्यांनी आपला स्वतःचा स्वतंत्र सोहळा करण्याचा निर्णय घेतला. लग्न 11 फेब्रुवारी रोजी होते. ही गोष्ट समजल्यानंतर पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा छोटा भाऊ शालिग्राम मध्यरात्री 12 च्या सुमारास आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लग्नस्थळी पोहोचला. तिथे त्याने उपस्थित वऱ्हाडी मंडळींना धक्काबुक्की केली. तसेच धमकावले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी लग्न थांबवले. यामुळे वरात परत गेली. नातेवाईकही निघून गेले. त्यानंतर समजूत काढल्यानंतर त्याच रात्री लग्न झाले. दुसरीकडे, पं. धीरेंद्र शास्त्री यांच्या भावाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व जनक्षोभ उसळल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. तेव्हापासून आरोपी शालिग्राम फरार होता. त्याला गुरुवारी अटक करण्यात आली.
वर आकाशने केला होते जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
आकाश अहिरवारने आरोप केला आहे की, 11 फेब्रुवारी रोजी रात्री वऱ्हाडी जेवण करत होते. अंगणात डीजे वाजत होता. तेव्हा शालिग्रामने येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. लग्नात गदारोळ केला. त्याच्या हातात पिस्तूलही होता. त्याने हवेत 2-3 फैरी झाडल्या. शिवीगाळ करू नका, असे सांगणाऱ्याला तो मारहाण करत होता. आकाश अहिरवारने सांगितले की, बागेश्वर धाममध्ये 18 तारखेला सामूहिक लग्न सोहळा होणार होता. आम्ही त्यात लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे शालिग्राम भडकला होता.
भीम आर्मी व ओबीसी महासभेने काढली होती रॅली
सौरव गर्ग उर्फ शालिग्रामच्या अटकेप्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी भीम आर्मी व ओबीसी महासभेने छतरपूर येथून बाइक रॅली काढली होती. ही रॅली गढा गावात पोहोचल्यानंतर पीडित कुटुंबीयांची बाजू ऐकण्यात आली. बैठकीनंतर भीम आर्मीचे प्रदेश संयोजक सुनील बैरसिया यांनी या प्रकरणी पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शालिग्रामला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती. असे न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही त्यांनी इशारा दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.