आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे एकूण ७६ जवान जखमी झाले होते. लष्कराच्या सूत्रांनी गुरुवारी हे जाहीर केले. यानुसार १८ जवानांना गंभीर जखमा झाल्या आहेत. लेह रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित ५८ विविध रुग्णालयांत आहेत. त्यांच्या जखमा फार गंभीर नाहीत. सर्व जवान १५ दिवसांत पुन्हा ड्यूटीवर येतील. दुसरीकडे भारताने गुरुवारी चीनला इशारा देत ताबा रेषेवरील हालचाली मर्यादित ठेवा, असे बजावले. दरम्यान, हा तणाव कमी करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांत चर्चा सुरू होती. या हल्ल्यानंतर आपला एकही जवान बेपत्ता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयासह भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.
नि:शस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी का पाठवले : राहुल यांचा सवाल
चीनने भारताच्या नि:शस्त्र सैनिकांची हत्या करून गुन्हा केला आहे. चीनने आपल्या नि:शस्त्र जवानांच्या हत्येची हिंमत केलीच कशी? या वीरांना शस्त्राविना शहीद होण्यासाठी का पाठवण्यात आले. याला जबाबदार कोण?- राहुल गांधी, काँग्रेस नेते
जवान शस्त्रसज्ज होते, करारामुळे त्यांनी गोळी चालवली नाही
सीमेवर तैनात सैनिक शस्त्रसज्जच असतो. गलवान खोऱ्यात गेलेले सैनिकही शस्त्रसज्ज होते. परंतु, गोळीबार करायचा नाही अशी दीर्घ परंपरा (१९९६ व २००५ चा करार) पाळण्यासाठी त्यांनी गोळी चालवली नाही. - एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
संरक्षण तज्ज्ञ लेफ्ट. जनरल (निवृत्त) विनोद भाटिया म्हणाले, स्वसंरक्षणार्थ शस्त्र उचलणे हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. मग सैनिकाला तो कसा नसेल? जग याला घटनात्मक अधिकार मानते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.