आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये पुन्हा अकाली दल-भाजपची युती होणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागला आहे. याचे कारण म्हणजे जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांचा झालेला पराभव. अकाली दलाने बसपासोबत युती करून ही निवडणूक लढवली होती.
भाजप एकटाच रिंगणात होता. दोन्ही पक्षांची मते दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसपेक्षा जास्त, तर 'आप'च्या विजयी उमेदवारापेक्षा काही हजारांनी कमी होती. त्यामुळे शिअद-भाजपने ही निवडणूक एकत्र येऊन लढवली असती, तर चित्र वेगळे दिसले असते, असा दावा केला जात आहे.
शेतकरी आंदोलनावेळी अकाली दलाने भाजपसोबतची युती तोडली होती. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारमधील अकालीच्या एकमेव मंत्री हरसिमरत बादल यांनी राजीनामा दिला होता.
अकाली दलाचे प्रवक्ते डॉ. दलजीत चीमा यांनी यासंबंधीच्या 3 प्रश्नांची उत्तरे दिली...
युती तुटण्याचा फटका बसला का?
हा एक फॅक्टर आहे. दोन्ही पक्षांची तब्बल 21 वर्षे युती होती. त्यांचे तीनदा सरकार आले. विधानसभेच्या अनेक जागांवर हे पक्ष एकमेकांवर अवलंबून होते. जालंधरविषयी बोलायचे तर भाजपकडे 3 जागांवर आघाडी होती. तिथे आमच्या संघटनेला फटका बसला. निवडणुकीत पुढे युतीचा दुसरा मित्रपक्ष असेल तिथे आमची बाजू दुबळी होते.
युती झाली तर फायदा काय?
आजही दोघांच्या मतांची बेरीज केली तर विजय अकाली दल व भाजपचा झाला असता. माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निधनामुळे आम्हाला प्रचाराला मुबलक वेळ मिळाला नाही.
भविष्यात पुन्हा युती शक्य आहे का?
हे पाहा, ही पंजाबमधील एक मोठी नैसर्गिक युती होती. ही आघाडी पंजाबला एक मोठा सामाजिक संदेश देत होती. युतीचे अनेक फायदे - तोटे असतात.
निवडणुकीत अकाली दल - भाजपला किती मते मिळाली?
अकाली दल-बसपा युतीचे उमेदवार डॉ. सुखविंदर सुखी यांना 1 लाख 58 हजार 445 म्हणजेच 17.85% मते मिळाली. सुखी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. चौथ्या क्रमांकावर असणारे भाजपच्या इंदर इक्बाल सिंग अटवाल यांना 1 लाख 34 हजार 800 म्हणजेच 15.19% मते मिळाली.
अकाली दल - भाजप उमेदवाराची एकूण मते विजयी उमेदवाराहून जास्त आहेत का?
आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार सुशील रिंकू यांनी जालंधर लोकसभा मतदारसंघात 58 हजार 691 मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 3 लाख 02 हजार 097 मते मिळाली. अकाली दल व भाजपची मते जोडली तर ती 2 लाख 93 हजार 151 एवढी होतात. त्यानंतरही त्यांना 'आप'च्या रिंकू यांच्यापेक्षा 8 हजार 946 मते कमी पडली असती.
पण ही युती 49 हजार 701 मतांसह दुसऱ्या क्रमांकाची 2 लाख 43 हजार 450 मते खिशात घालणाऱ्या काँग्रेसच्या कर्मजित कौर चौधरी यांच्यापुढे राहिली असती. यामुळे हीच गोष्ट युती पुन्हा अस्तित्वात येण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, अकाली दलाने ही निवडणूक स्वबळावर लढली नाही. त्याची बसपाशी आघाडी होती. जालंधर दलित मतदारबहुल मतदार संघ असल्यामुळे तिथे बसपचा चांगला जनाधार आहे.
अकाली दलात सुरू आहे युतीची मागणी
अकाली दलाच्या अनेक नेत्यांनी भाजपशी युती करण्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निधनावेळी विरसा सिंग वलटोहा व प्रेमसिंग चंदूमाजरा आदी नेत्यांनी असे संकेत दिले होते.
भाजप हायकमांडचे अकाली दलाशी चांगले संबंध
पंजाब भाजपच्या नेत्यांचा आघाडीला विरोध असला तरी हायकमांड अकाली दलावर मवाळ आहे. यामुळेच माजी मुख्यमंत्री बादल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. अंत्यसंस्काराच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही बादल गावी पोहोचले होते. अखेरच्या प्रार्थनेच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा आले. यामुळे शिअद-भाजप आघाडीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा केला जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.