आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अखेर माफी मागितली आहे. त्यांनी हिंदू हा शब्द पर्शियातून आला असून हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचे म्हटले होते. यानंतर मोठा वाद उफाळला होता. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतरही जारकीहोळी यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.
तसेच मला खोटे सिद्ध करा, आमदारकीचा राजीनामा देतो, असे आव्हानही केले होते. मात्र, आता एका दिवसानंतरच त्यांनी आपली भुमिका बदलल्याचे दिसून आले आहे. बुधवारी त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
सतीश जारकीहोळी वादाची टाइमलाइन...
1. रविवारी केले होते वादग्रस्त विधान
कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते जारकीहोळी सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले होते की, हिंदू शब्दाचा उगम कुठून झाला? हा शब्द आपला आहे का? हा इराण, इराक, उझबेकिस्तान, कझाकिस्तानातील पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा भारताशी काय संबंध? या शब्दाचा स्वीकार तुम्ही कसा करू शकता? यावर चर्चा व्हायला पाहिजे. हिंदू’ शब्दाचा भारताशी काहीही संबंध नाही, हा शब्द लोक कसा काय स्वीकारु शकतात, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच या शब्दाचा अर्थ जर कळला तर तुम्हाला लाज वाटेल, असेही जारकीहोळी म्हणाले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जारकीहोळी हे कर्नाटक सरकारमध्ये माजी मंत्री राहिले आहेत.
2. काँग्रेसने वक्तव्याचा निषेध केला, भाजपने याला व्होट बँकेचे राजकारण म्हटले
जारकीहोळी यांचे वक्तव्य अत्यंत दुर्देवी असल्याचे सांगत काँग्रेसकडूनही निषेध नोंदवण्यात आला आहे. हिंदू धर्म ही एक जीवनशैली असून सभ्यतेचे वास्तव आहे. काँग्रेसने धर्म, संस्कृती आणि श्रद्धा जपण्यासाठी देशाची निर्मिती केली आहे. हेच भारताचे सार आहे, असे ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे.
जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने आता काँग्रेसवर निशाणा साधत याला व्होट बँकेसाठीचा प्रयत्न असल्याचे म्हटले. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, शिवराज पाटील यांच्यानंतर आता कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे. हा योगायोग नाही. हे व्होटबँकसाठी आहे.
विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना विहिंपचे नेते विनोद बन्सल म्हणाले की, "काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. ज्याला कोणताच नावीक नाही.
3. मंगळवारी जारकीहोळी म्हणाले - चुकीचे सिद्ध केले तर मी आमदारकी सोडेन
सतीश जारकीहोळी यांनी व्हिडिओ जारी करत आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मी जे बोललो त्यात काहीही चुकीचे नाही. अशा हजारो नोंदी आहेत, ज्यात हिंदू हा शब्द पर्शियनमधून आल्याचे लिहिलेले आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकाश, डॉ.जी.एस.पाटील यांच्या बसव भारत या पुस्तकात आणि बाळ गंगाधर टिळकांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख आहे. ही तर काही उदाहरणे आहेत. विकिपीडिया किंवा इतर संकेतस्थळांवर असे अनेक लेख आहेत. ते तुम्ही वाचावे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जर कोणी मला चुकीचे सिद्ध केले तर मी केवळ वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही तर आपल्या आमदारकीचा राजीनामाही देईल.
4. बुधवारी जारकीहोळींनी माफी मागितली, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली.
दोन दिवस आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी बुधवारी माफी मागितली. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून आपले म्हणणे मागे घेतले. वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे ते म्हणाले.
या विषयावर चर्चा व्हायला हवी, असे मी म्हणालो होतो. मी विकिपीडिया, डिक्शनरी आणि इतिहासकारांनी काय लिहिले आहे याआधारे प्रश्न उपस्थित केले होते. परंतु काही लोक मला हिंदुविरोधी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी माझे विधान मागे घेत आहे. माझ्या वक्तव्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, याबद्दल मला खेद आहे.
गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला
काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर भगवद् गीता व ख्रिश्चन धर्मातही असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. गीतेच्या एका भागात श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याचे ते म्हणाले होते. पाटील यांच्या या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेत भाजप प्रवक्त्याने काँग्रेसवर मतपेटीचे राजकारण करण्याचा आरोप केला होता. येथे वाचा पुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.