आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचे युग परत आले आहे. दहशतवादी हे जवानांसह काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. गुरुवारी राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून SPO वर गोळ्या झाडल्या. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. काश्मीरमध्ये काही तासांतच खुनाची ही दुसरी घटना आहे.
तत्पूर्वी गुरुवारी बडगाममध्ये दहशतवाद्यांनी चदूरा तहसीलदार कार्यालयाचे लिपिक राहुल भट्ट यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. आज शुक्रवारी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील गुदुरा येथील SPO रियाझ अहमद ठोकर यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये एन्काऊंटर, सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील बेरार (अरगाम) येथे शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. येथे दहशतवादी लपल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिस आणि इतर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर केलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येमागे याच दहशतवाद्यांचा हात होता. ते लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते आणि त्यांनी अलीकडेच भारतात प्रवेश केला होता. हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले आहे.
राहुल भट्ट यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी झाली होती
राहुल भट्ट यांच्यावर शुक्रवारी सकाळी बंतलाब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंह, विभागीय आयुक्त रमेश कुमार, उपायुक्त अवनी लवासा यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्याचवेळी घटनास्थळी पोहोचलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांना लोकांनी विरोध केला.
जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी निदर्शने
तत्पूर्वी गुरुवारी रात्री ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. काश्मिरी पंडितांनी मृतदेह घेऊन रस्त्यावर निदर्शने केली आणि उपराज्यपाल येईपर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यानंतर DIG सुजित कुमार यांच्या आश्वासनावरून मृतदेह घरी नेण्यात आला.
पंडित म्हणाले - जोपर्यंत सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत नोकरीवर परतणार नाही
त्याचवेळी बडगाममधील शेखपोरा पंडित कॉलनीजवळ काश्मिरी पंडितांनी निदर्शने केली. जोपर्यंत त्यांना सुरक्षेची पूर्ण हमी मिळत नाही तोपर्यंत ते नोकरीवर जाणार नाहीत, असे ते म्हणाले. दुसरीकडे छावणीत राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी महामार्ग चक्का जाम करून केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी मेणबत्त्या लावून निदर्शने करण्यात आली. येथे आपल्याला सुरक्षित वाटत नाही, काश्मिरी पंडितांना परत आणण्याचे सरकारचे दावे फोल ठरताना दिसत आहेत असे पंडितांचे म्हणणे आहे.
अनंतनागमध्ये आंदोलन
अनंतनागमध्ये काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करणाऱ्या अमितने सांगितले की, गेल्या 3 महिन्यांतील आमच्या समाजातील ही तिसरी हत्या आहे. आम्हाला सरकारकडून संरक्षण हवे आहे.
अशा घटना सातत्याने घडत आहेत
काश्मीरमधील दहशतवादी अनेक महिन्यांपासून काश्मिरी पंडितांवर हल्ले करत आहेत. 14 एप्रिल रोजी सतीश कुमार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याआधी शनिवारी अली जान रोडवर असलेल्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता राहुलच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजय राऊत म्हणाले - गृहमंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा
राहुल भट्ट यांच्या हत्येवर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, काश्मिरी पंडितांची घरवापसी होण्याची चर्चा होती. 7 वर्षात किती लोक मायदेशी परतले हे माहीत नाही, पण जे तिथे राहत होते त्यांनाही राहू दिले जात नाही, त्यांचीही हत्या केली जात आहे. गृहमंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा असे मला वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.