आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्षण होता काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देण्याचा...अन् प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखाद्या काँग्रेस नेत्याच्या निरोप समारंभात चक्क रडू कोसळले. आझाद यांनाही भावना आवरल्या नाहीत. भावनांना दोघांनीही वाट मोकळी करून दिली. मोदी म्हणाले, “तुम्ही (आझाद) सभागृहातून निवृत्त होत आहात, पण मी तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही. माझी दारे तुमच्यासाठी, सर्वांसाठी नेहमीच खुली आहेत.’
मोदी म्हणाले, “२००५मध्ये काश्मीरमध्ये गुजराती पर्यटकांवर हल्ला झाला तेव्हा मला (तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते) पहिला फोन करणारे आझाद होते. माझ्याशी बोलताना त्यांना अश्रू आवरता येत नव्हते...’ हे सांगताना मोदींचेही डोळे पाणावले. यानंतर बोलताना आझाद म्हणाले, “तेव्हा हल्ल्यानंतर मी विमानतळावर पोहोचलो तर एका मुलाने माझे पाय धरले. त्याचे आई-वडील हल्ल्यात मारले गेले होते. मला तेव्हा रडू आवरले नाही.’ हे सांगताना तेही भावुक झाले. सावरल्यावर सांगू लागले, “... मी तेव्हा एवढेच म्हणालो, या खुदा...हे काय झाले? या मुलांना काय सांगू. ते पर्यटनासाठी आले आणि आता कफनमध्ये परतत आहेत.’
राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूही भावुक झाले. ते म्हणाले, “सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या निधनानंतर आता आझाद यांची निवृत्ती माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. आझाद कधीच निवृत्त होणार नाहीत. ते लवकरच पुन्हा परततील.’
मी नशीबवान, कारण मी पाकिस्तानी नव्हे, हिंदुस्थानी मुस्लिम आहे...
कित्येक वर्षांनंतर एखाद्या काँग्रेस नेत्याने संसदेत काश्मिरी पंडितांबाबत ठोस वक्तव्य केले. आझाद यांनी अल्लाह आणि देवाला भारतातून दहशतवाद संपावा असे साकडे घातले. पाकिस्तानी मुस्लिमांमध्ये अनेक वाईट गुण आहेत, असे सांगून ते गुण भारतीय मुस्लिमांमध्ये कधीही येऊ नयेत, अशी प्रार्थनाही केली. आपण हिंदुस्थानी मुसलमान आहोत, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.
आझाद यांनी अटलबिहारी, सोनिया अन् मोदींचे नाव घेतले; राहुलचे टाळले
सभागृहातील शेवटच्या भाषणात आझाद यांनी काँग्रेसच्या इंदिरा गांधी, संजय-राजीव गांधी यांच्या आकस्मिक मृत्यूचा उल्लेख करून सोनियांचा एक वेळा उल्लेख केला. मात्र, राहुल गांधी यांचे एकदाही आभार मानले नाहीत. दुसरीकडे, अटलबिहारी वाजपेयींची स्तुती केली. आपल्या भाषणात सहा वेळा पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेखही त्यांनी केला.
आझादांना काँग्रेस उमेदवारी देणार नाही; मोदी म्हणतात, निवृत्त होऊ देणार नाही
आझाद यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही प्रक्रियेसाठी कायम आवाज उठवला. काँग्रेस कार्यकारिणीच्या गेल्या वेळी झालेल्या बैठकीत यावरून त्यांचा के. सी. वेणुगोपाल यांच्याशी वाद झाला होता. अध्यक्षपदाची निवडणूक टाळू नये, असे त्यांचे मत होते. काँग्रेस आता त्यांना राज्यसभेत पुन्हा पाठवणार नाही. यावर मोदींनी हे सांगत धक्का दिला, की ‘तुमच्यासाठी (आझाद) माझी द्वारे नेहमी खुली राहतील. अनुभव नेहमीच कामी येतो. तो मलाही मिळेल. तुम्हाला मी निवृत्त होऊ देणार नाही. भविष्यात आझाद यांना जी जबाबदारी मिळेल ती देशासाठी फायद्याचीच असेल.’
मैं कश्मीरी पंडितों का हितैशी हिंदुस्तानी हूं
"जे कधी पाकला गेलेच नाहीत अशा नशीबवान लोकांपैकी मी एक. हिंदुस्थानी मुसलमान असल्याचा मला अभिमान.'
काँग्रेस नेत्यासाठी प्रथमच मोदींच्या डाेळ्यांत पाणी
"गुलाम नबी आझाद फक्त आपल्या पक्षाची काळजी करत नाहीत, सभागृह आणि देशाची त्यांना अधिक चिंता असते.'
मोदी-आझाद यांची जुगलबंदी नव्या कहाणीचे संकेत...
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडल्यानंतरच्या चर्चेतही आझाद फार आक्रमक नव्हते. मोदींनी मोठ्या मनाने काश्मीरसंबंधीचे विधेयक मागे घ्यावे, एवढेच भाष्य त्यांनी केले होते. या वेळी राजकीय अभ्यासकांनीही आझाद यांची ही नरमाईची भूमिका आगामी काळातील नव्या समीकरणाची नांदी मानली होती. त्यामुळे आता याबद्दल अधिक उत्सुकता आहे.
आझाद यांनी मंगळवारी काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबाबत उल्लेखही केला नाही. हे कलम हटवले तेव्हा सरकारवर हल्ला करण्यात तेच आघाडीवर होते. वास्तविक काश्मीरमध्ये आता पंचायत, जि. प. निवडणुका झाल्या आहेत. जम्मूमध्ये पाय रोवलेल्या भाजपकडे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील एकही मोठा मुस्लिम चेहरा नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.