आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नेतृत्व बदलाच्या मागणीवरून सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक तणावपूर्ण वातावरणात झाली. बैठक सुरू होताच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी नेतृत्वात बदलासंबंधी २३ ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राचा हवाला देत पद सोडण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, ७ तासांच्या मंथनानंतर त्या आणखी ६ महिने हंगामी अध्यक्ष राहण्यास तयार झाल्या. बैठकीत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांच्या भाजपशी हातमिळवणीचा आरोप गाजला. सूत्रांनुसार, पत्राच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित करून राहुल म्हणाले की, भाजपशी हातमिळवणी करून पत्र लिहिले आहे. त्यावर बैठकीत व बैठकीबाहेर वातावरण तापले. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी गुलाम नबी आझाद यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेऊ, असे म्हटले. कपिल सिब्बल यांनी ट्वीट करत आक्षेप घेतला. मात्र, राहुल यांनी भाजपशी हातमिळवणीबाबत कुठली टिप्पणी केली नाही, असा दावा काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला.
आई रुग्णालयात होती तेव्हाच पत्र का लिहिले : राहुल
सूत्रांनुसार, राहुल यांनी विचारले की, आई रुग्णालयात होती, तेव्हाच का पत्र लिहिले? राजस्थान सरकार संकटात होते तेव्हा पत्र लिहिले. पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चर्चा कार्यकारिणीत व्हावी, माधमांत नव्हे. हे पत्र भाजपशी हातमिळवणी करून लिहिलेय.
बैठकीत २० वर नेते बोलले, सर्वांनी राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी केली
कार्यकारिणीच्या बैठकीत २० पेक्षा जास्त नेते बोलले. सर्वांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी केली. बहुतांश नेत्यांनी पत्र लिहिणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. पण, सोनिया गांधींनी संपूर्ण काँग्रेस परिवारात एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला.
३० वर्षांत भाजपच्या समर्थनार्थ वक्तव्य केले नाही : सिब्बल
राहुल यांच्या टिप्पणीनंतर सिब्बल यांनी ट्वीट केले-‘आम्ही भाजपशी संधान साधले आहे, असे राहुल म्हणतात. मी राजस्थान हायकोर्टात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मी ३० वर्षांपासून भाजपच्या बाजूने वक्तव्य केले नाही.’ मात्र, राहुल यांच्या फोननंतर सिब्बल यांनी ट्वीट डिलीट केले.
राहुल नव्हे, इतरांच्या टिप्पणीवर राजीनाम्याचा प्रस्ताव : आझाद
गुलाम नबी आझाद म्हणाले, भाजपसोबतची हातमिळवणी सिद्ध करा असे मी बैठकीत म्हटले नाही. भाजपच्या सांगण्यावरून पत्र लिहिले, असे राहुलही म्हणाले नाहीत. आम्ही भाजपच्या सांगण्यावरून पत्र लिहिले, असे काल काही जण म्हणाले होते, एवढेच मी म्हणालो. मी त्यासंदर्भात टिप्पणी केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.