आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Defamation Case; Bjp Sambit Patra Attack Congress | Sonia Gandhi | Priyanka Gandhi

सुनावणी:मानहाणीच्या प्रकरणात राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयात जामीन, शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर 13 एप्रिल रोजी सुनावणी

सुरत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी चार्टर्ड विमानाने सोमवारी दुपारी सव्वा 2 च्या सुमारास सुरतला पोहोचले. - Divya Marathi
राहुल गांधी चार्टर्ड विमानाने सोमवारी दुपारी सव्वा 2 च्या सुमारास सुरतला पोहोचले.

सुरत सत्र न्यायालयाने सोमवारी मानहाणीच्या एका प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर 13 एप्रिलपर्यंत जामीन मंजूर केला. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी राहुल याना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. राहुल यांनी याविरोधात स्थगिती व जामिनासाठी सोमवारी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राहुल यांच्या लीगल टीमशी संबंधित एका सदस्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली नाही. त्यावर 13 एप्रिल रोजी सुनावणी होईल. तर शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी होईल.

न्यायालयाने या प्रकरणी याचिकाकर्त्याची बाजू ऐकल्याशिवाय सुनावणी करणार नसल्याचे स्पष्ट केले. परिणामी, कोर्टाने याचिकाकर्ते व भाजप नेते पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे. त्यावर 10 एप्रिलपर्यंत त्यांना आपले प्रत्युत्तर सादर करायचे आहे.

राहुल दिल्लीहून सुरतला रवाना होण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजता सोनिया गांधींनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर तासाभराने राहुल सुरतच्या दिशेने रवाना झाला. राहुल यांच्यासह प्रियंका गांधी तथा राजस्थान, छत्तीसगड व हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीही सुरतला पोहोचलेत. राहुल यांच्या आगमनापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

मानहाणीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा

सुरत न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधींना मानहाणीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना 2 वर्षांची कैद व 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. कोर्टाने राहुल यांना शिक्षेला आव्हान देण्यासाठी 30 दिवसांचा अवधीही दिला होता. त्यानंतर आता राहुल न्यायालयात दाद मागत आहेत. राहुल यांना कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. राहुल केरळच्या वायनाडचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत होते.

रिजीजू म्हणाले - कोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले - तुमच्यावर (राहुल गांधी) ट्रायल सुरू होती, तेव्हा तुम्ही अपील का केले नाही. तुम्ही आता भीती घालण्यासाठी हे नाटक करत आहात. कोर्टाने तुम्हाला दोषी घोषित केले. त्यानंतर तुमचे नाटक सुरू झाले. हा कोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्ष संपूर्ण कुटुंबाला देशाहून मोठे मानते.

सुरतमध्ये काँग्रेसची निदर्शने

राहुल यांच्या शिक्षेसह त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याविरोधात काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहांसह संपूर्ण देशात केंद्राच्या कथित दडपशाहीविरोधात निदर्शने केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या सुरत दौऱ्यातही तीव्र निदर्शने करण्यात आली. यासाठी पक्षाच्या बड्या नेत्यांसह राज्यातील नेतेही सुरतला पोहोचले होते.

राहुल यांना शिक्षा झाल्यानंतरच्या 3 मोठ्या घटना

23 मार्च : मानहानी प्रकरणी शिक्षा

सुरत न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर अवघ्या 27 मिनिटांतच त्यांना जामीन मिळाला. राहुल यांनी 2019 मध्ये कर्नाटकच्या एका प्रचारसभेत मोदी आडनावाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

24 मार्च : संसद सदस्यत्व रद्द

24 मार्च रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने 2013 च्या एका आदेशानुसार, कनिष्ठ न्यायालयात दोषी ठरलेला कोणताही खासदार किंवा आमदार संसद व विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरेल.

27 मार्च : सरकारी बंगला सोडण्याची नोटीस

लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने 27 मार्च रोजी राहुल यांना आपला सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली होती. समितीने त्यांना 22 एप्रिलपर्यंत 12 तुघलक रोड येथील शासकीय निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले. दुसरीकडे, 27 मार्च रोजी विरोधकांनी राहुल यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ ब्लॅक प्रोटेस्ट केला होता.

राहुल गांधींविरोधात दाखल मानहाणीच्या खटल्यांची माहिती घ्या...

  • 2014 मध्ये राहुल गांधींनी आरएसएसवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप केला. या प्रकरणी संघाच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात भादंवि कलम 499 व 500 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्रातील भिवंडी न्यायालयात हा खटला सुरू आहे.
  • 2016 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात आसामच्या गुवाहाटीत कलम 499 व 500 ​​अंतर्गत मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, राहुल गांधींनी आरएसएसवर आसामच्या 16 व्या शतकातील वैष्णव मठ बारपेटा सत्रात आपल्याला प्रवेश दिला नसल्याचा आरोप केला होता. यामुळे संघाची प्रतिमा मलिन झाली. हे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे.
  • 2018 मध्ये झारखंडची राजधानी रांचीमध्ये राहुल गांधींविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. रांचीच्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. भादंवि कलम 499 व 500 अंतर्गत राहुल यांच्यावर 20 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल यांच्या मोदी चोर आहेत या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
  • 2018 मध्येच राहुल गांधींवर महाराष्ट्रात आणखी एक मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. माझगाव येथील शिवडी न्यायालयात हा खटला सुरू आहे. या प्रकरणी भादंवि कलम 499 व 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरएसएस कार्यकर्त्याने हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राहुल यांच्यावर गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप व संघाच्या विचारसरणीशी जोडल्याचा आरोप आहे.
  • 2018 मध्ये एडीसी बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीनंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत 5 दिवसांत 745.58 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. या बँकेच्या संचालकांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे.
  • 2017 मध्ये बंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. राहुल यांनी या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडल्याप्रकरणी मुंबईत एक मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीचे विधान बदनामीकारक व लोकांच्या नजरेत संघाची प्रतिमा मलिन करणारे आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
  • 2018 मध्ये राहुल यांनी राफेल फायटर जेट डीलवरून भाजपची खिल्ली उडवली. त्यांनी एका ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते - The Sad Truth About India Commander in Thief. या प्रकरणी गुरगाव कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
  • 2019 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जबलपूरमध्ये हत्येचा आरोप केला होता. या संदर्भात अहमदाबाद कोर्टात राहुलच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
  • झारखंडमध्ये 2019 मध्ये राहुल म्हणाले - काँग्रेस भाजप सारखा एका खुनी व्यक्तीला केव्हाच अध्यक्ष म्हणून स्वीकार करणार नाही. त्यांच्या या विधानाप्रकरणी चाईबासा व रांचीमध्ये मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
  • 2022 मध्ये राहुल म्हणाले की, सावरकरांनी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या माफीनाम्यावर सही केली होती. या प्रकरणी सावरकर यांचे नातू विनायक सावरकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.