आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार सुरू आहे. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या कारवर गुरुवारी पश्चिम मिदनापूरच्या पंचखुडीमध्ये जमावाने हल्ला केला. लोकांनी दगडफेक व लाठ्यांनी हा हल्ला केला. हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या. केंद्रीय मंत्र्यांनी स्वत: या हल्ल्याची माहिती दिली. तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. वाहनांच्या खिडक्या तोडल्या. कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. माझा चालकही जखमी आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आरोप केला. केंद्रातील मंत्री राज्यात हिंसाचार भडकवू लागले आहेत, असे त्यांनी म्हटले.
कूचबिहार जिल्ह्यातील गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाइकांना होमगार्डची नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या १६ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाखांची सानुग्रह मदत देण्याचा निर्णयदेखील त्यांनी जाहीर केला. बंगालमधील परिस्थिती पाहता केंद्रीय गृह मंत्रालयदेखील सक्रिय दिसते. गृह मंत्रालयाची चारसदस्यीय टीम बंगालमध्ये दाखल झाली आहे. ही टीम हिंसाचाराचा तपास करणार आहे. बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय शिष्टमंडळाने राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या गृह मंत्रालयाच्या पथकासोबत कोलकाता येथील बीएसएफ कार्यालयात चर्चा केली. तत्पूर्वी गृह मंत्रालयाने राज्यपालांकडून अहवाल मागवला होता. हिंसाचारासंबंधीची माहिती मागवण्यात आली होती. अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही टीम बंगालमध्ये पोहोचली आहे.
राज्यात जनादेश स्वीकारण्यास अजूनही भाजप तयार नाही
ममता म्हणाल्या, भाजप अजूनही जनादेश स्वीकारण्यास तयार नाही. निवडणूक आयोगाच्या हाती राज्याची कायदा-सुव्यवस्था होती. याच काळात हिंसाचार झाला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला. त्यात निम्मे तृणमूलचे लोक होते. निम्मे भाजपचे होते. एक कार्यकर्ता संयुक्त मोर्चाचा होता. नवीन सरकार सत्तेवर येऊन २४ तासही लोटले नाही आणि ते पत्र पाठवत आहेत.
घोष, विजयवर्गीय, शिव प्रकाश, मेनन तिकीटवाटपावरून लक्ष्य
वरिष्ठ भाजप नेते व मेघालय-त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, प्रभारी कैलाश विजयवर्गीय, शिव प्रकाश, अरविंद मेनन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सप्ततारांकित हॉटेलात बसून त्यांनी तृणमूलमधून आलेल्या कचऱ्याला उमेदवारी दिली. आता पक्षाचा शेवट जवळ आला आहे, असे रॉय यांनी सांगितले.
मंत्र्यावर हल्ला होतो, मग सामान्य माणसाचे काय?
भारत सरकारच्या मंत्र्यावर हल्ला होतो. मग सामान्य लोकांचे तर विचारायला नको. निवडणूक निकाल आल्यापासून बंगालमध्ये तृणमूल प्रायोजित हिंसाचार आणखी वाढला. आमच्या कार्यकर्त्यांवर सतत हल्ले होत आहेत-जेपी नड्डा, भाजपा अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.