आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा3 आदिवासी महिलांनी तब्बल 1 किलोमीटर लांब रस्त्यावर दंडवत घालत पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अजब घटना घडली आहे. या प्रकरणी आता वाद सुरू झाला आहे. या महिलांनी यापूर्वी भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्या पुन्हा टीएमसीत परतल्या. त्यांना प्रायश्चित म्हणून रस्त्यावर दंडवत घालण्याची शिक्षा देण्यात आली, असा आरोप भाजपने या प्रकरणी केला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना बालूरघाटच्या तपनची आहे. येथील 3 महिलांनी जवळपास 1 किलोमटीर दंडवत घातला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या महिलांना भररस्त्यात दंडवत घालताना सर्वचजण थक्क होत होते. दुसरीकडे, या महिलांनी भाजपत जाण्याच्या आपल्या कृत्याचे प्रायश्चित म्हणून असे केल्याचा दावा टीएमसीने केला आहे.
'TMC ने आदिवासी महिलांना दिली शिक्षा'
या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले, या तिन्ही महिला भाजपला सोडचिठ्ठी देऊन टीएमसीत प्रवेश करण्यासाठी गेल्या होत्या. पण तिथे या महिलांना प्रवेश देण्यापूर्वी 1 किलोमीटर लांब दंडवत घालण्याची शिक्षा देण्यात आली. भाजपने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्याचेही संकेत दिलेत.
भाजपचा आरोप - तृणमूलचा आदिवासींना विरोध
भाजप प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, तृणमूल काँग्रेसने नेहमीच आदिवासींना विरोध दर्शवला आहे. या तिन्ही महिलांसोबत जे काही करण्यात आले, तो आदिवासींचा अवमान आहे. या प्रकरणी आदिवासी समाजाने तृणमूलविरोधात निदर्शने केली पाहिजेत. त्याचा बदला लोकशाही पद्धतीने घेतला पाहिजे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसने द्रौपदी मुर्मु यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीलाही विरोध केला होता.
केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी ममतांवर साधला होता निशाणा
केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रमाणिक यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील विद्यमान स्थिती प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसून ममता बॅनर्जी फारच उथळ गोष्टी करत आहेत. मीच नाही तर संपूर्ण देश बंगालमधील हिंसाचारासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आहे.
ममतांची पक्षनेत्यांसोबत बैठक
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षनेत्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर टीएमसी खासदार सुदीप बॅनर्जी म्हणाले होते की, काँग्रेसने स्वतःला विरोधकांचा बॉस समजू नये. पक्षाची प्रस्तुत बैठक प्रादेशिक पक्षांची एकजूट करण्यासाठी व काँग्रेसपासून समान अंतर ठेवण्यावर बोलावण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते.
बॅनर्जी म्हणाले होते - राष्ट्रीय व राज्य पातळीवर टीएमसी आपल्या पूर्ण ताकदीने पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. काँग्रेस काय करत आहे हे मला माहिती नाही. पण बंगालमध्ये काँग्रेस, भाजप व सीपीएम एकत्र आहेत. ते ममता सरकारला नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे आमचे विरोधी पक्षांना एकजूट होण्याचे आवाहन आहे.
'काँग्रेसने स्वतःला विरोधकांचा बिग बॉस समजू नये'
खासदार सुदीप बॅनर्जी म्हणाले होते की, टीएमसीने अद्याप आपण भाजप व काँग्रेसपासून समान अंतरावर असल्याचे स्पष्ट केले नाही. त्यामुळे काँग्रेसने स्वतःला विरोधकांचा बिग बॉस समजू नये. मोदींचा विजय सोपा व्हावा यासाठी भाजप राहुल हेच आपले विरोधक असल्याचे जनतेच्या मनावर बिंबवत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वकाही स्पष्ट होईल. एनडीएच्या 18 पैकी 15 घटक पक्षांनी भाजपची साथ सोडली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.