आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुलडाणा- सहकारी संस्थांच्या व्यावसायिकतेला चालना देत शेतीपूरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सहकार विकास महामंडळाने अटल अर्थसाह्य योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्पाला ४० लाख रुपये म्हणजेच प्रकल्पाच्या ७५ टक्के अनुदान देण्यात येणार असून बुलडाणा जिल्ह्यासाठी १७ कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना व्यवसाय व उद्योग उभे करून देण्यास मदत होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गावातील शेतकरी सभासदांना शेती कर्जे देण्याचे माध्यम म्हणून सध्या सोसायट्या काम करतात. त्यांच्या वसुलीवर या संस्थांना मोबदला मिळतो. एवढ्यावरच या संस्था टिकून आहेत. वसुली नसलेल्या सोसायट्यांची गोची होते. याशिवाय गावातील राजकारणही याच माध्यमातून होत असते. कुणाला सभासद करायचे, कुणाला कर्जे द्यायची, हे ठरवण्याचे अधिकार सोसायट्यांना आहेत. ग्रामीण विकासास साहाय्यभूत ठरणाऱ्या, सहकारी संस्थांच्या कृषी व कृषिपूरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे, शेतमाल उत्पादनातून शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी तसेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकारी संस्थांनी त्या त्या भागात शेतमालावर प्रक्रिया व विक्री करावी यास प्रोत्साहन, शेतकरी ते ग्राहक यामध्ये असणारी मूल्य साखळी कमी करावी. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. जसे-गोदामात साठवणूक, ग्रामीण भागातील शिक्षित तरुण शेतीशी निगडित व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेल्या व्यवसायात त्याला सामावून घ्यावे, प्रक्रिया केलेली उत्पादने शहरी भागात, घाऊक विक्रेते, निर्यातदार, प्रक्रियादार, किरकोळ विक्रेते, बाजार समित्या, मॉल या ठिकाणी नेऊन त्याची विक्री करावी. जेणेकरून अधिक दर मिळेल. शुद्ध पाणीपुरवठासाठी यंत्रणा अर्थसाह्य देण्यात येणार आहे. यामाध्यमातून विविध शेतीपूरक व्यवसायांंचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या प्रथम वर्षाच्या अंमलबजावणीच्या मूल्यमापन अहवालाच्या आधारावर ही योजना पुढे सुरु ठेवण्यात येणार आहे. हे अर्थसाह्य आत्महत्याग्रस्त गावांतील सोसायट्यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या ७५ टक्के अनुदान
एकूण प्रकल्पाच्या साडेबारा टक्के हिस्सा देऊन सोसायट्यांना या योजनेत सहभागी होता येते. एकूण प्रकल्प किंमत ४० लाख रुपये ठरले. त्याच्या ७५ टक्के अनुदान मिळेल. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून सहकारी संस्थांना १२.५० टक्के कर्ज दिले जाईल.
पात्र सोसायट्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा
ज्या संस्था या प्रकल्पाकरता पात्र ठरणार त्यांना अर्थसाह्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र सोसायट्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. महेश कृपलानी, प्रभारी जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा
सोसायट्यांना करता येणारे उद्योग
या पैशातून सोसायट्यांनी धान्य, फळे, भाजीपाला प्रतवारी स्वच्छता यंत्र, गोदाम, वाहतुकीसाठी वाहने, सहकारी ग्राहक भांडार, जलशुद्धीकरण प्रकल्प, वॉटर एटीएम, शेतमाल पॅकेजिंग, कापडी किंवा ज्यूट पिशव्यांची निर्मिती, असे उद्योग करू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.