यश भल्याभल्यांना आंधळे बनवते. याची अनेक उदाहरणे
आपल्याला आढळतात. त्यात दिग्दर्शक रवी जाधव या नव्या नावाची भर पडली आहे. प्रेम आंधळे असते असे म्हणतात, परंतु मायबाप प्रेक्षक डोळस असतात. याचे भान रवी जाधव सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने ठेवायला हवे. 'टाइमपास 2' मध्ये हे भान दिग्दर्शकाने राखलेले नाही. बहुतेक प्रेक्षकांना गृहीत धरून त्यानं 'टाइमपास 2' सादर केला आहे. खरेतर वर्षभरापूर्वी आलेला त्याचा टाइमपास प्रेमाला वेगळ्या उंचीवर नेणारा होता. पहिल्या प्रेमाचे ताजे, टवटवीत, प्रसन्न करणारे चित्रण त्या 'टाइमपास'मध्ये होते.
निरागस मांडणी, सकस कथा त्या जोडीला श्रवणीय गीत-संगीत याच्या जोरावर त्या 'टाइमपास'ने प्रत्येकाच्या मनात घर केले होते. 'टाइमपास'ला मोठे यश मिळाले. मात्र यश आंधळे करते या उक्तीचा प्रत्यय 'टाइमपास 2' मध्ये पदोपदी येतो. हरवलेली निरागसता, ओढून ताणून भरलेले प्रसंग, जमवलेले विनोद व सातत्याने पहिल्या टाइमपासची केलेली पाठराखण यामुळे 'टाइमपास 2'मधून प्रेक्षकांच्या हाती नवे काहीच लागत नाही. एक सत्वहीन, व्यावसायिक पठडीतील प्रेमकथा माथी मारल्याचे शल्य बोचत राहते.
निरागस चेहरे, निष्पाप व निर्व्याज्य प्रेम, त्यातून फुलणारे प्रसंगनिष्ठ विनोद ही पहिल्या टाइमपासची सारी वैशिष्ट्ये 'टाइमपास 2' मध्ये नसल्याने हिरमोड होतो. बरे पहिला 'टाइमपास' सर्वांना फ्रेम टू फ्रेम पाठ असताना पुन्हा पुन्हा त्यातील प्रसंगाची आठवण करून देण्यात दिग्दर्शकाने काय साधले? हे त्यालाच ठाउक. 'नया है वह'ची पुढील आवृत्ती पाहण्यास गेलेल्यांच्या माथी नया कुछ नही वही पुराना है असे काही मारण्यात काय हुशारी? हे समजण्यास वाव नाही. मनाला भिडणारे संवाद व तितकीच दमदार पटकथा ही पहिल्या भागातील दोन तगड्या बाजू दुसऱ्या भागात लंगड्या पडल्या आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता खूप न ताणता दुसरा भाग लवकरात लवकर देण्याच्या नादात सारे मुसळ केरात… असे काहींसे 'टाइमपास 2' मध्ये झाले आहे.
कथा :
दगडू (प्रियदर्शन जाधव) मोठा झाला आहे. त्याची सीडीची कंपनी आहे. तिकडे प्राजक्ता (प्रिया बापट) त्याच्या प्रेमात वेडी आहे. माधवराव (वैभव मांगले) प्राजक्तासाठी स्थळ शोधताहेत. दगडू प्राजक्ताचा माग काढत कोकणात दाखल होतो. प्राजक्ता मुंबईत काम करत असते. माधवराव खोटे सांगून दगडू त्यांच्या मनात जागा मिळवतो. मात्र खरे कळल्यानंतर झिडकारतो. मग प्राजक्ता पुढाकार घेते. अनेक वळणांनंतर दगडू-प्राजक्ता विवाहबध्द होतात.
दिग्दर्शन :
रवी जाधवला पहिल्या भागातील चमक येथे दाखवता आली नाही. दुसऱ्या भागात सातत्याने पहिल्या भागांचा त्याला आधार घ्यावा लागला आहे. दुसऱ्या भागासाठी त्याने विशेष गृहपाठ केलेला नसल्याचे स्पष्ट जाणवते.
पुढे वाचा, उर्वरित रिव्ह्यू..