आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये. जिया खानने 2 जूनच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रेमात आणि करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे नैराश्येपोटी जियाने आपली जीवनयात्रा संपवली अशी चर्चा होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीची कसून चौकशी केली होती.
आता पोलिसांच्या हाती एक नवीन पुरावा लागला आहे. जिया खानच्या कुटुंबीयांनी पोलिसांना जिया खानचे सहा पानी पत्र दिले आहे. मृत्यूपूर्वी जियाने हे पत्र लिहिले असल्याचे म्हटले जात आहे. या पत्रात जियाने सूरज पांचोलीबरोबरच्या नात्यात अपयश आल्याचे नमूद केले आहे.
हे पत्र जियानेच लिहिले आहे की नाही याचा शोध पोलिस घेणार आहेत. यासाठी पोलिस हस्ताक्षर तज्ञांची मदत घेणार आहेत. जेणेकरुन हे पत्र स्वतः जियानेच लिहिले आहे की नाही, यावर शिक्कामोर्तब केला जाऊ शकेल.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जियाने पत्रात लिहिले आहे की, ''तू माझी फसवणूक केली आहे. मी आपल्या नात्यावर विश्वास ठेवला होता. मात्र तू आपल्या नात्याची कधीचत पर्वा केली नाही. तू जेव्हा हे पत्र वाचशील, तेव्हा कदाचित मी या जगात नसेल.''
आता या पत्रावरुन तरी जियाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा उलगडा होण्यास मदत होईल, असे म्हणायला हरकत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.