नवी दिल्ली- आरबीआयने आज तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रोपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून तो 7.5 टक्के ठेवण्यात आला आहे. सीआरआरमध्येही काही बदल झालेला नसून तो 4 टक्केच ठेवण्यात आला आहे. आरबीआयने दरांमध्ये बदल करुन कोणताही लाभ दिला नसला तरी गेल्या तिमाहीत कमी करण्यात आलेल्या दरांचा लाभ ग्राहकांना न दिल्याने गर्व्हनर रघुराम राजन यांनी बॅंकांना कडक शब्दांत सुनावले आहे. दरांमध्ये झालेल्या बदलांचा लाभ ग्राहकांना का दिला नाही, अशी विचारणा राजन यांनी केली आहे.
यासंदर्भात रघुराम राजन म्हणाले, की बॅंकांना व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या खर्चात कोणतीही घट झालेली नाही हे कारण बनावट आहे. बॅंकांना जेव्हा व्याज दरांमध्ये वाढ करायची असते तेव्हा आरबीआयच्या दरांचे कारण सांगून तसे लगेच केले जाते. पण आरबीआयने दर कमी केले तर मात्र व्याजदर कमी केले जात नाहीत.
आरबीआयने रेपो दरात दोन वेळा कपात केली असतानाही खासगी आणि राष्ट्रीय बॅंकांनी व्याज दरात कपात केलेली नाही.
रघुराम राजन यांची बॅंकांना आवाहन
बॅंका जेवढ्या लवकर व्याज दरांत कपात करतील तेवढी भारतीय अर्थव्यवस्था बळकट होईल, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. आरबीआयकडून दरांत कपात करण्यात आल्याने बॅंकांचा बेस रेट कमी करण्यास कोणतीही अडकाठी नाही. पण वैयक्तिक लाभासाठी बॅंका असे करताना दिसून येत नाहीत. बेस रेट कमी झाला तर कर्ज स्वस्त होतील. त्याचा फायदा ग्राहकांना होईल. कर्ज घेण्याचे प्रमाण वाढेल. पर्यायाने अर्थव्यवस्था सशक्त होईल.