आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष रघुराम राजन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. आर्थिक मंदीचे वातावरण लक्षात घेता राज्यातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी, तसेच रोजगार निमिर्तीसाठी लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी बँकिंग क्षेत्राने पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
चव्हाण आणि राजन यांची विविध विषयांवर सुमारे एक तास चर्चा झाली. जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम देशाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. मात्र, त्याचा फटका राज्यातील उद्योगांना आणि विकासकामांना बसू नये, यासाठी बँकिंग क्षेत्राने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. मंदीच्या काळात रोजगारावर विपरीत परिणाम होतो. म्हणून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने विशेषत: मध्यम आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांचे आर्थिक नियोजन सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी बँकिंग क्षेत्राकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. राज्याला टंचाईमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने योजलेल्या उपायांची माहितीही चव्हाण यांनी त्यांना दिली. विकेंद्रीत पाणीसाठा हा यावरचा महत्वाचा उपाय असल्याने शेवटच्या टप्प्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहील, असेही ते म्हणाले. चव्हाण यांनी राजन यांना त्यांच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.