नवी दिल्ली- अन्य बँकांच्या एटीएममधून रुपये काढणार्या ग्राहकांना आता प्रत्येक वेळी शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे (आरबीआय) प्रस्ताव पाठवला आहे. शहरातील एटीएमवर प्रत्येक ट्रान्झक्शनवर 20 रुपये शुल्क आकारावा असे प्रस्तावात आरबीएने म्हटले आहे. विशेष म्हणजे आरबीआय यावर सकारात्मक विचार करत असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढता खर्च भरून काढण्यासाठी शहरातील स्वत:च्या बँकेव्यतिरिक्त अन्य बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क आकारण्यात यावे, अशी शिफारस रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली; परंतु ग्रामीण आणि निमशहरी भागाला मात्र या शुल्कात वगळावे, असे मत असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. टांकसाळे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव देशभरातील बँकांच्या एटीएमच्या मोफत व्यवहारांची संख्या मोठ्या शहरांसाठी मर्यादित करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ग्राहक मेट्रो शहरांमध्ये अथवा मोठ्या शहरांमध्ये राहत असेल तर दुसर्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी वेगळे शुल्क भरावे लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या देशात अन्य बँकांच्या एटीएममधून किमान पाच वेळा रक्कम काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला वीस रुपये शुल्क आकारण्यात येते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सुरक्षात्मक उपायोजनांचा बँकांवर वाढता भार...
(फाइल फोटो: एटीएममधून रुपये काढताना ग्राहक)