आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन येथील दुर्बल शेतक-यांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यावर देना बँक अधिक भर देणार असल्याची माहिती अध्यक्ष अश्विनी कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रथमच ते पुणे भेटीवर आले होते. बँकेच्या पुणे विभागात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, परभणी, बीड उस्मानाबाद, औरंगाबाद आणि नगरसह १४ जिल्हे येत असून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विचार करता त्यातील दुर्बल घटकांना बँकिंग सेवा कशी पुरवता येईल यावर भर दिली जाणार आहे. ते म्हणाले की, पुण्यात आणि परिसरात वाहन उद्योगाला सुट्या भागांचा पुरवठा करणारे अनेक लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्यांच्या भांडवली गरजांकडे बँक अधिक लक्ष देणार आहे. सध्या अशा उद्योगांना दिलेली कर्जाची रक्कम ९५६७ कोटी रुपये आहे. येत्या २६ मे रोजी बँक ७५ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त ठेवीदारांसाठी विशेष योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच पुणे विभागात आणखी ५-६ नव्या शाखा सुरु करण्याचा विचार आहे.
पुण्यातील वाहन उद्योगाचा मोठा पसारा लक्षात घेऊन चाकण, पिंपरी चिंचवड या भागातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जाईल.
बँकेच्या निधी पूर्तीसाठी चालू आणि बचत खात्यांची संख्या वाढविण्यास विशेष मोहीम राबविण्यात येत असून १३ जानेवारी रोजी एका दिवसात अशी ३५ हजार नवी खाती मिळविण्यात आम्हाला यश आल्याचे त्यांनी नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.