नवी दिल्ली - सुमारे १२ लाख कोटी रुपयांची कंपनी
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग गुरुवारी दिल्लीत होते. भारताच्या गरजेनुसार शेतकरी, पलायन करणारे लोक आणि महिलांसाठी स्थानिक भाषांत अॅप काढण्यासाठी मदतीची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी भारतात स्पर्धाही घेतली जाईल.
झुकेरबर्ग यांनी इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही भर दिला. कनेक्टिव्हिटी हा लोकांचा मूलभूत अधिकार असावा. जोडले गेल्याने लोकांचे आयुष्य सुखकर होते. तंत्रज्ञान, शिक्षण आणि नोक-यांपर्यंत सहज पोहोचता येते, असे ते म्हणाले. "इंटरनेट डॉट ओआरजी' कंटेंट समिटमध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
मोबाइलवर इंटरनेट स्वस्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच भारतात ६९ टक्के लोकांकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. यामुळे त्यांच्यातील सर्जनशिलता आणि विचारांपासून जग वंचित राहत असल्याचेही झुकेरबर्ग म्हणाले.
इंटरनेट - ओआरजी | या प्रोजेक्टचे उद्दिष्ट जगातील ५०० कोटी लोकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या कक्षेत आणायचे आहे. फेसबुक, एरिक्सन, मीडिया टेक,
नोकिया, ऑपेरा, क्वालकॉम आणि
सॅमसंगसारख्या कंपन्या याच्या सदस्य आहेत.
मोदींना आज भेटणार
झुकेरबर्ग शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यात खालील मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
1. इंटरनेट प्रसारात भागीदारी : ग्रामीण भागासाठी प्रस्ताव. येथे सध्या केवळ ३ टक्के लोकांकडेच इंटरनेट आहे.
2. डिजिटल इंडिया, ई-गव्हर्नन्स : मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना. शिक्षण, आरोग्याच्या क्षेत्रातही फेसबुक मदत करण्याची शक्यता.
3. टॅक्स प्रणालीत सुलभता : सोयीच्या व्यापार व्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत भारत १३४ व्या स्थानी आहे.
4. गुप्तचर माहितीची मागणी : मागील वर्षी भारताने फेसबुककडे ६,८४३ वेळा माहिती मागितली होती.
5. लाइक किंवा कॉमेंटवर कारावास : आयटी कायद्यानुसार अनेक फेसबुक युजर्सना तुरुंगात जावे लागले आहे.
जगात ४४० कोटी लोकांकडे सध्या इंटरनेटची सुविधा नाही.
* भारतात केवळ २४.३ कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत.
* यातील १० कोटी लोक फेसबुकदेखील वापरत आहेत.