नवी दिल्ली : सोन्यातील गुंतवणूकदारांना यंदाचे वर्ष नुकसानीचे ठरले आहे. गुंतवणूकदारांना रिअल इस्टेट तसेच बँकांच्या मुदत ठेवींवरही (एफडी) कमी परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात शेअर्सने ३० टक्के, तर म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांना ५२ टक्के परतावा मिळाला आहे. सोन्यातील गुंतवणूकदारांना सुमारे ९ टक्के, तर चांदीत १८ टक्क्यांचे नुकसान सोसावे लागले आहे.
उदाहरण शेअर बाजार
मागील एक वर्षात कोणत्या साधनातून कसा परतावा मिळाला हे एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊ. एका गुंतवणूकदाराने १० ऑक्टोबर २०१३ रोजी शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बँक एफडी, रिअल इस्टेट, सोने व चांदी यात प्रत्येकी १० हजार गुंतवले, तर त्याला एक वर्षानंतर कोणत्या साधनातून किती परतावा मिळाला हे पाहू . १० ऑक्टोबर २०१३ रोजी बीएसई-३० इंडेक्स २०२७३ या पातळीवर होता. वर्षानंतर १० ऑक्टोबर २०१४ रोजी हा निर्देशांक २६,२९७ या पातळीवर आहे. गुंतवणूकदाराला अशा रीतीने १० हजारांचे १३ हजार रुपये मिळाले. शेअर्सच्या मधून ३० टक्के परतावा मिळाला.
म्युच्युअल फंड
बीएसईमध्ये म्युच्युअल फंड मिड कॅपमधील १० हजार रुपयांचे मूल्य एक वर्षानंतर वाढून १८४३५ रुपये झाले आहे. म्हणजे ८४.३ टक्के परतावा. एचडीएफसी मिड कॅप १२ ऑक्टोबर २०१३ रोजी १० हजार रुपये टाकले असतील तर १० ऑक्टोबर २०१४ रोजी ही रक्कम १७८९६ रुपये झाली असून लाभ ७७.७ टक्के झाला. रेलिगेयर टॅक्स सेव्हर योजनेत चांगला लाभ झाला. १२ ऑक्टोबर २०१३ रोजी केलेली १० हजारांची गुंतवणूक १० ऑक्टोबर २०१४ रोजी १५,५६० रुपये झाली. याचाच अर्थ ५५.६ टक्के परतावा मिळाला.
रिअल इस्टेट
वेगवेगळ्या क्षेत्रांतून घेतलेल्या माहितीनुसार घर, फ्लॅट यात केलेल्या गुंतवणुकीतून वर्षभरात सरासरी १५ टक्के रिटर्न मिळाला आहे.
बँक एफडी
बँकांतील मुदत ठेवींवर ९ टक्के दराने गुंतवणूकदाराला १० हजारांच्या गुंतवणुकीवर १०,९०० रुपये मिळाले. परतावा ९ टक्के.
सोने : सोन्यातील गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला नफ्याऐवजी तोटा झाला आहे. रांची येथे १२ ऑक्टोबर २०१३ रोजी सोने २८,५०० रुपये तोळा होते. ११ ऑक्टोबर २०१४ रोजी ते घसरून २६,००० रुपयांवर आले आहे. अशा प्रकारे १० हजार मूळ रकमेचे मूल्य एक वर्षात ९१२३ रुपये झाले. सोन्यातील गुंतवणुकीत ८.७७ टक्के नुकसान झाले.
चांदी : १२ ऑक्टोबर २०१३ रोजी रांची येथे चांदी ५० हजार रुपये किलो होती. एक वर्षानंतर ११ ऑक्टोबर रोजी किंमत ४१ हजारांपर्यंत घसरली. अशा प्रकारे चांदीतील गुंतवणुकीत सुमारे १८ टक्के तोटा आला.