आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
दहावीनंतर मी पी.यू.सी.त परळीच्या ‘वैद्यनाथ’ मध्ये शिक्षण घेत होतो. त्या वेळी माझी द्वितीय भाषा हिंदी होती. हिंदी भाषा असल्याने कला, विज्ञान आणि वाणिज्य सर्व शाखेचे सर्व विद्यार्थी त्या वर्गाला एकत्र यायचे शिकवायला मॅडम होत्या. मॅडम सर्व विद्यार्थ्यांना सोबत शिकवत असत. त्यादिवशी मॅडमनी कविता शिकवण्याचे ठरवले असता त्यांनी राधा-कृष्णाच्या पे्रमाबाबत एका कवितेचे चार कडवे शिकवून झाले होते, तर उरलेले एक कडवे दुस-या दिवशी त्यांनी शिकवले.
नेमके त्यादिवशी मी उशिरा वर्गात आलो. तोपर्यंत शिकवणे होऊन झाले होते आणि मॅडमनी विचारले ‘कुणाला काही शंका असेल, काही समजले नसेल तर विचारा’ मी उशिरा आल्याने एका कला शाखेच्या विद्यार्थ्याजवळ बसलो होतो. त्याने हळूच माझ्या कानात सांगितले ,‘तु उशिरा आलास.. शेवटचे कडवे समजले नाही असे म्हण’ तेव्हा त्याचे ते म्हणणे ऐकून मीही कोणता विचार न करता उठलो आणि तसेच म्हणालो. त्याबरोबर वर्गात हास्यकल्लोळ उडाला. मॅडमही त्यात सामील झाल्या होत्या. सर्व विद्यार्थी मला हासत, माझी मस्करी करीत होते, असे होत असताना मी भांबावलो; परंतु मॅडमनी जाणले की याला कोणीतरी फसवले आहे. कारण, ती कविता अतिशय सोपी होती आणि त्या कवितेत न समजण्यासारखे काहीही नव्हते. त्या कवितेत कृष्णाने राधाला लिहिलेलं पत्र जेव्हा तिला मिळतं तेव्हा तिला झालेला आनंद त्या कवितेत व्यक्त केलेला होता. मॅडमनी त्या वेळी ती पूर्ण कविता पुन्हा शिकवली, रोख त्या विद्यार्थ्यांकडेच होता. त्या वेळी कळले कुणी काही सांगितले व घाईघाईने आपण त्याचे ऐकले तर काय फजिती होते, याची शिकवण मात्र मिळाली. महाविद्यालयात मित्रांची फजिती होताना पाहून वेगळाच आनंद मिळत असतो. दिवसभर त्याला गंडवल्याचा आनंद चेह-या वरुन वाहतो. प्रत्येक मित्राजवळ तसेच कट्टयावर क्लासमध्ये घडलेल्या विनोदाची चर्चा रंगतदारपणे होत असते. कॉलेजचे दिवस वेगळेच असतात. तेव्हाचे आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवण्यास मिळत नाहीत, हेच खरे!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.