महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला असून खातेवाटपही झाले आहे. आता केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा सत्तेतील सहभाग आणि त्या अनुशंगाने करण्यात येणारे बदल याचीच वाट बघितली जात आहे. असे असले तरी खुद्द मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने कामाला सुरवात केली आहे. महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याचा कारभार सांभाळणे काही सोपी बाब नाही. एवढा मोठा जबाबदारीचा डोलारा यशस्वीपणे पेलण्यासाठी प्रभावी नेतृत्व गुणांची गरज असते. अंगभुत कौशल्यांचा यावेळी कस लागतो. या पार्श्वभूमिवर बघुयात देवेंद्र फडणवीस यांचे बलस्थाने आणि कमकुवत बाजू... त्यावरच ठरेल महाराष्ट्राचे पुढील पाच वर्षातील भवितव्य...
इतर राजकीय पक्षांचा सत्तेतील सहभाग हा भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या अखत्यारीतला विषय नसल्यानेही फडणवीस सरकारला याची डोकेदुखी नाही. केंद्रीय नेतृत्व आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. यात फडणवीस यांना किती सहभागी करुन घेतले जाते हे बघण्यासारखे असेल. शिवाय राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देऊन सत्तेची गणिते फिरवली आहेत. भाजपला जास्त पर्याय उपलब्ध करुन देऊन
आपला राजकीय मुरब्बीपणा सिद्ध केला आहे.
सत्तेची गणिते काही राहिली तरी राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाली आहे हे मात्र नक्की. या सत्तेच्या नेतृत्वस्थानी देवेंद्र फडणवीस आहेत. यापूर्वी नगरसेवक, महापौर आणि प्रदेशाध्यक्ष राहिल्या फडणवीसांना राज्य स्तरावरील प्रशासकीय अनुभव नाही. शिवाय ते प्रभावी वक्ते, नेते किंवा प्रशासक राहिले असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार बघताना त्यांची बलस्थाने आणि कमकुवत बाबी निश्चितच भविष्यातील घडामोडींवर प्रभाव टाकणार आहेत. त्याचे फायदे आणि तोटे सर्वसामान्य जनतेवर परिणाम करणार आहेत.
तेव्हा पुढील स्लाईडवर जाणून घेऊयात, देवेंद्र फडणवीस यांची बलस्थाने... कमकुवत बाबी... त्यांचा शासकीय कारभारावर कसा पडेल परिणाम....