मुंबई - स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच अनपेक्षितपणे मुंबई आणि कोकणात प्रमुख पक्षातील नेत्यांनी सेनेत प्रवेश करण्यास प्रारंभ केला आहे. राष्ट्रवादीतील राज्य मंत्री उदय सामंत, भाजपचे आमदार सरदार तारासिंह यांनीही शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सेनेच्या तंबूत उत्साहाचे वातावरण आहे.
शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी काही आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. बंडखोरी टळावी म्हणून उमेदवारांची यादी जाहीर करताच एबी फॉर्मचे वाटप शिवसेनेने केले खरे, परंतु नावांची कुणकुण लागल्याने शिवसेनेला बंडखोरीची लागण लागली आहे.
वांद्रे पूर्व येथून बाळा सावंत यांनाच शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, या मतदारसंघातून श्रीकांत सरमळकर इच्छुक होते. नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या श्रीकांत सरमळकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. तिकीट मिळाल्याने श्रीकांत सरमळकर यांनी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
धारावी येथे बाबुराव माने यांना शिवसेनेने तिकीट दिल्याने धारावीतील शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे. मातोश्रीसमोर धरणे धरून शिवसैनिकांना निषेधही व्यक्त केला होता. धारावीतून तीन उमेदवार इच्छुक असून त्यापैकी एक जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे समजते. दहिसर येथे शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना तिकीट दिल्याने नाराज माजी महापौर शुभा राऊळ यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. विनोद घोसाळकर यांच्यावर शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी अनेक आरोप केलेले आहेत. असे असताना घोसाळकरांना तिकीट दिल्याने या नगरसेविका नाराज झालेल्या आहेत.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.