गांधीनगर- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची रविवारी दूरदर्शनवर मुलाखत प्रसारीत झाल्यानंतर अनेक मुद्यांवर वाद सुरू झाले. याच मुलाखतीत नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल एकेकाळी आपले मित्र होते. आम्ही सोबत जेवणही करायचो. मात्र, त्यांनी आता दुरावा ठेवला आहे, असा दावा केला होता. त्यावर पटेल यांनी आक्षेप घेतला. पण मुलाखत संपादीत केल्यामुळे मोदींचे म्हणणे योग्य पद्धतीने पोहोचले नसल्याचे भाजपने म्हटले आहे. सरकारने मुलाखत संपादीत करण्यासाठी दूरदर्शनवर दबाव आणल्याचा आरोपही भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे ही संपूर्ण मुलाखतही भाजपच्या वतीने प्रसारीत करण्यात आली आहे.
भाजपने प्रसारीत केलेल्या पूर्ण मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, की अहमद पटेल हे काँग्रेसमधील माझ्या चांगल्या मित्रांपैकी एक आहेत. पण आता तसे नाही. बहुधा त्यांच्या माझ्याविषयी काही तरी तक्रार आहे. त्यामुळे सध्या त्यांनी माझ्यापासून दुरावा ठेवला आहे. ते तर सध्या माझा फोनही घेत नाहीत. मी एकेकाळी त्यांच्या घरी जेवण करायला जायचो. आमची चांगली मैत्री होती.
पण मोदींच्या मुलाखतीनंतर अदमद पटेल यांनी त्यांच्या दाव्यांचे खंडन केले आहे. मोदींचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. देशाचे विभाजन करायला निघालेल्या व्यक्तीबरोबर आपली कसलीही जवळीक नाही. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांच्या घरी किंवा कार्यालयातही गेलेलो नाही. मोदींनी तसे सिद्ध करून दाखवल्यास मी सन्यास घेईल या शब्दांत पटेल यांनी त्यांना दावा फेटाळला.
मोदींनी प्रियंका गांधी आपल्या मुलीप्रमाणे असल्याचे वक्तव्यही या मुलाखतीत केले होते. मात्र, संपादन करताना हा भागही वगळण्यात आला होता. दूरदर्शनवर मोदींची ३५ मिनिटांची संपादीत मुलाखत प्रसारीत करण्यात आली होती. संपादन करताना सुमारे १९ मिनिटांचा भाग वगळण्यात आला होता. या मुलाखतीचे संपादन करताना राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोप भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारमण यांनी केला आहे.
दूरदर्शन, सरकारने आरोप फेटाळले
दूरदर्शनने मात्र त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे मुलाखत संपादीत करण्यात आल्याचे दूरदर्शनचे म्हणणे आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनीही दूरदर्शनच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नसल्याचे म्हटले आहे. प्रसारभारती ही स्वायत्त संस्था असून सरकार त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नसल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, अनकट व्हिडिओ.....