सातारा - ‘राष्ट्रवादीकाँग्रेससोबत आघाडी कायम ठेवून जातीयवादी पक्षांना महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर ठेवण्यास आमचे प्राधान्य आहेच. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने काही अशक्यप्राय अटी- शर्ती घालून बोलणी सुरू ठेवल्यास मात्र आघाडी होणे अवघड आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी आघाडीत बिघाडीचे संकेत दिले. काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांच्या मुंबई, नागपूरसह राज्यात सहा सभा होतील, असेही त्यांनी सांगितले.
महायुतीप्रमाणेच सत्ताधारी आघाडीतील जागावाटपाचे घोडेही अडलेलेच आहे. गेल्या दोन दिवसांत कॉँग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांत चर्चेच्या दोन फेऱ्या होऊनही त्यातून ठोस असे काहीच निष्पन्न झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील चर्चेचा ‘फड’ सोडून मुख्यमंत्री बुधवारी
आपल्या कराड मतदारसंघात प्रचारासाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितल्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी पत्रकारांना उत्तर देणे टाळले.