बमाको - मागच्या वर्षी हजमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या भाविकांचे नातेवाईक सौदी अरेबियाच्या सरकारवर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणात सौदी सरकारच्या भूमिकेमुळे आफ्रिका खंडातील माली या देशातील मृतांचे नातेवाईक नाराज आहेत. २४ सप्टेंबर २०१५ रोजी घडलेल्या या चेंगराचेंगरीत २ हजार ४२६ भाविक मारले गेले होते. त्यात मालीतील ३२० नागरिकांचा समावेश होता. वकील मार्सेल सेकाल्डी यांनी खटल्याबाबतची माहिती दिली. पीडित नातेवाइकांचे प्रतिनिधी मलिक कोनाटे यांच्या मते, माली सरकार व ट्रॅव्हल एजन्सींनी हजची व्यवस्था केली होती. परंतु, घटनेत मृत पावलेल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही.