काठमांडू- नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरुच आहे. गोरखा जिल्ह्यातील बारपार्क आज (शनिवार) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास हादरले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.1 एवढी नोंदवण्यात आल्याचे भूकंप विज्ञान केंद्रातील भूकंपतज्ज्ञ मुकूल भट्टाराय यांनी माहिती दिली.
नेपाळमध्ये 25 एप्रिलला आलेल्या विध्वंसकारी भूकंपाने आतापर्यंत 6,621 जणांचा बळी घेतला आहे. जळखींची संख्या 14 हजारांवर पोहोचली आहे. अजुनही हजारो लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे ढिगार्याखाली अडकलेल्यांपैकी कोणी जिवंत असण्याची आशा देखील नेपाळ सरकारने सोडली आहे. नैसर्गिक
आपत्ती येऊन एक आठवडा उलटला आहे. बचावकार्य वेगात सुरु आहे. परंतु, आता कोणीच जिवंत नसेल, असे नेपाळचे गृहमंत्री लक्ष्मीप्रसाद धकाळ यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, भारतासारखा शेजारी मिळणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी म्हटले आहे.
'फेसबुक' युजर्सची नेपाळवासियांना मदत...
भूकंपानंतर नेपाळमधील जनजीवन सुरळीत होत आहे. नेपाळमधील भूकंपग्रस्तांनासाठी 'फेसबुक'ने 'इंटरनॅशनल मीडिया कॉर्प'कडे निधी जमा करण्याचे आवाहन केले होते. अवघ्या दोन दिवसांत फेसबुक युजर्सनी सुमारे 670 कोटी रुपये (10 बिलियन डॉलर्स) जमा केले आहेत. याशिवाय फेसबुकने 2 दशलक्ष डॉलर्स मदत जाहीर केली आहे.
युनिसेफने दिला महामारीचा इशारा
भूकंपग्रस्त नेपाळमधील परिस्थिती पाहाता पुढील काही दिवसांत तेथे महामारी पसरण्याचा इशारा युनिसेफने दिला आहे. नेपाळमध्ये अधुन मधुन पाऊस होत आहे. त्यामुळे ढिगार्याखाली अडकलेले मृतदेह कुजत आहेत. परिणाम दुर्गंधी देखील पसरली आहे. नेपाळमध्ये 1.7 मिलियन नागरिक आजारी पडू शकतात. भूकंपग्रस्त पर्वतीय भागात मुलांच्या आरोग्याचा प्रश्न सगळ्यात चिंताजनक आहे. कारण अनेकांना बेघर व्हावे लागले आहेत. काही भागातील वसाहती पूर्णपणे उद्धवस्त झाल्या असून त्यांचा संपर्क तुटला आहे. नेपाळला जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय संस्थांनी केली आहे.
भूकंपग्रस्त नागरिक उघड्यावर आले आहेत. त्यांना मदत शिबिरात पुरेशा सुविधा मिळत नाही आहेत. नेपाळमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. भूकंपामुळे पाणी दुषीत झाले आहे. मृतदेह सापडेल तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत.