स्टॉकहोम- जगभरात २००४ नंतर शस्त्रास्त्रांची विक्री सातत्याने वाढते आहे. गेल्या पाच वर्षांतील विक्रीचा हा आकडा तर शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजे १९९० नंतर सर्वाधिक झाला. भारताने या पाच वर्षांत सर्वाधिक, १३ टक्के शस्त्रास्त्रे खरेदी केली. चीन (४.५ टक्के) आणि पाकिस्तान (३.२ टक्के) देखील टॉप - १० खरेदीदारांत आहेत. पण भारताने या दोन्हींच्या एकूण आयातीपेक्षा दुप्पट शस्त्रास्त्रे खरेदी केली. भारताने ६८ टक्के शस्त्रास्त्रे रशियाकडून खरेदी केली.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिप्री)ने २०१२-१६ च्या दरम्यान झालेल्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार २०१२ ते २०१६ च्या दरम्यान आशिया आणि अधिक लांबीचे सागर किनारे असलेल्या देशांनी जगभरातील ४३ टक्के शस्त्रास्त्रे खरेदी केली. हे प्रमाण २००७ - ११ च्या तुलनेत ७.७ टक्के अधिक आहे. शस्त्रास्त्रांची विक्री वाढण्याचे सर्वात मोठे कारण मध्य पूर्व आशियातील सरकारे आणि बंडखोरांदरम्यान सुरू असलेला संघर्ष हा आहे. सिप्री हा अहवाल पाच वर्षांच्या आकड्यांच्या आधारावर प्रसिद्ध करते.
पाच देश विकताहेत जगभरातील ७४ टक्के शस्त्रास्त्रे
अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनी जगातील ७५ टक्के शस्त्रास्त्रे विकतात. गेल्या ५ वर्षांत अमेरिका ३३ टक्के शस्त्रास्त्रांच्या विक्रीसह वरच्या क्रमांकावर राहिला. २००७ -११ च्या तुलनेत त्याच्या विक्रीत ३ टक्के वाढ आहे. अमेरिका,चीन वगळता तिन्ही देशांचे मार्केट शेअर कमी झाले.
चीन होत आहे स्वयंपूर्ण, भारत मात्र दुसऱ्यांच्या भरवशावर : अहवालानुसार चीन टॉप-१० आयातदारांत समाविष्ट होण्याशिवाय नवी शस्त्रास्त्रे बनवून स्वयंपूर्ण होत आहे. भारत शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानात अद्यापही रशिया, अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय देशांवर अवलंबून आहे.