इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांचा मुलगा बिलावर भुट्टो - झरदारीने भारताकडून संपूर्ण काश्मिर घेतल्याशिवाय राहाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर पलटवार करत भारताने भारताची एकता आणि अखंडता याबरोबर तडजोड शक्य नसल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देणे गरजेचे नसल्याचे म्हटले आहे. तर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भारताकडे पाकिस्तानला नष्ट करण्याचीही शक्ती असल्याचे म्हटले आहे.
पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बिलावल बोलत होते. ते म्हणाले, 'काश्मिर हा पाकिस्तानचा भाग आहे. आम्ही आमची एक इंच जमीन देखील सोडणार नाही.'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान
युसूफ रझा गिलानी यांच्या निवासस्थानी पीपल्स पार्टी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिलावल यांनी काश्मिर राग अळवला.
बिलावल हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांचे चिरंजीव आहेत. अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांचे काश्मीरवरील वक्तव्य, हे त्यांच्या पुनरागमनाचे चिन्ह मानले जात आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी पाकिस्तानमध्ये 2018 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत आई बेनझिर यांच्या परंपरागत राटेरोडा मतदारसंघातून निडणूक लढण्याची घोषणा केली होती.