राजू इयत्ता दुसरीच्या वार्षिक परीक्षेनंतर प्रथमच
आपल्या मामाच्या घरी जातो. राजूच्या मामाला दोन मुले असतात आदित्य व तानिया. राजूचे मामाच्या घरी फार लाड होतात. तिथे राजूला एक आगळीवेगळी गोष्ट दिसून येते. तो पाहतो की त्याचे मामा, मामी, शेजारी पाजारी, घरी आलेले पाहुणे सर्वच जण आदित्य व तानियाचे कौतुक करत असतात. ते सर्वाचेच लाडके आहेत हे पाहून तो फार बुचकळ्यात पडतो. कारण शेजारीपाजारी किंवा पाहुणे तर दूरच परंतु त्याचे आई-वडीलसुद्धा त्याचे कौतुक करत नसतात. असे का? खूप विचार केल्यावर तो आदित्य व तानिया यांच्या वागणुकीचे निरीक्षण करण्याचे ठरवतो. त्यांच्यात असे काय आहे जे माझ्यात नाही ते शोधून काढायचे ठरवतो. दोन दिवस तो त्यांच्या प्रत्येक कृतीचे बारकाईने निरीक्षण करतो आणि या निरीक्षणातूनच त्याला त्याच्या चुका कळून येतात.
तो पाहतो की, आदित्य व तानिया या दोघांनीही स्वत:ला काही नियम लावून घेतलेले आहेत, ज्याला आपण एटिकेटस असे म्हणतो. राजू पाहतो की, दोघेही आई-वडिलांचा मान राखून त्यांच्या आदेशाचे प्रेमाने पालन करतात. त्यांना कधीच उलट बोलत नाहीत. घरी आलेल्या पाहुण्यांशीही ते आदराने वागतात. घरात कधीच चप्पल, बूट घालून प्रवेश करत नाहीत. राजू मात्र प्रत्येक वेळी बूट घालून घरात फिरत असल्यामुळे आई-वडिलांचे ओरडे खात असतो. ज्यावेळी मामाचे कुटुंब व राजू एका वाढदिवसाच्या पार्टीला जातात, तेव्हा तो पाहतो की आदित्य व तानिया मोठ्यांना विचारूनच, तेथील प्रत्येक वस्तूला हात लावत होती.
पाहुण्यांसमोर नको ते हट्ट आई-वडिलांजवळ करत नव्हती. शिस्तबद्ध पद्धतीचे ते तिथे खेळत होती. हे सर्व पाहून राजू मनात विचार करतो, मी तर या उलटच सर्व करतो. पाहुण्यांसमोर आई-वडिलांचे ऐकत नाही. त्यांना उलट उत्तरे देतो. नको ते हट्ट धरतो. घरी आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करण्याचे तर दूरच पण त्यांच्याकडे साधे बघतसुद्धा नाही. मोठ्यांची थट्टामस्करी करतो. पाहुण्यांच्या उत्तराला उत्तर देतो. इतरांच्या घरी गेल्यावर न विचारता सर्व वस्तूंना हात लावतो.
हे सर्व विचार करता करता राजूला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते. त्याला समजून चुकत की, कोणत्याच एटिकेटसचे तो पालन करत नाहीत, म्हणून तो कोणाचाच आवडता नाही. त्यात क्षणी तो ठरवतो की आपणही आपल्या वागणुकीत हे एटिकेटस् वापरायचे, ज्यामुळे आपलेही सर्वजण कौतुक करतील. बालगोपाळांनो, तुम्हालाही आदित्य व तानियासारखे सर्वांचे लाडके व्हायचे असेल, तर तुम्हीही या एटिकेटसचे अवश्य पालन करा. या एटिकेटस््मुळे सर्वत्र तुमची प्रशंसा तर होईलच, पण त्याचबरोबर तुमच्या आरोग्याला त्याचबरोबर जीवनालाही एक नवीन वळण नक्कीच मिळेल.
काही एटिकेटस् टिप्स...
- आपले आई-वडील, गुरूजन हे आपल्या कल्याणाकरिता धडपडत असतात. तेव्हा त्यांचा मान राखून त्यांच्या प्रत्येक आदेशाचे प्रेमाने पालन करा.
- घरी आलेल्या पाहुण्यांशी आदराने वागा. त्यांची विचारपूस करा. नम्रपणे त्यांना चहापान किंवा जेवणाचा आग्रह करा. घरी आलेल्या पाहुण्यांना पुन्हा येण्याची विनंती करा. न विचारता कोणत्याही वस्तूंना हात लावू नका. चहापाणी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद माना.
- पार्टीला गेल्यावर हावरटपणा करू नका. काही पाहिजे असेल तर योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणातच मागा.
- आपल्या भावंडाशी व मित्र-मैत्रिणीशी समजूतदारपणे वागा कुठल्याही कारणास्तव त्यांच्याशी भांडण किंवा मारामारी करू नका.
- पत्रे किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांना आई-वडिलांना न विचारता हात लावू नका.
- स्वत:ला योग्य शिस्त लावून घ्या.
* चप्पल-बूट, घालून घरात प्रवेश करू नका.
* बाहेरून घरी आल्यावर प्रथम हातपाय, तोंड धुवा
* अभ्यासाची व खेळाची नियमित वेळ ठरवा.
* जास्त वेळ टी.व्ही. पाहण्याची सवय मुळीच लावू नका.
* कोणाशी खोटे बोलू नका.
* मुक्या प्राण्यांवर दया करा.
काय मग बालगोपाळांनो! या
एटिकेटस््चा वापर करून तुम्ही पण बनणार ना सर्वांचे लाडके!