आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आणि ओवेसी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या मराठवाड्यातील औरंगाबाद मध्य आणि मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या एमआयएमच्या अर्थात, ‘मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन’ या पक्षाच्या उमेदवारांची महाराष्ट्राच्या राजकारणात मोठीच चर्चा आहे. या पक्षाच्या महाराष्ट्रातील आगमनामुळे आता महाराष्ट्रात अराजक येणार आहे, इथपासून तर या पक्षाला रोखण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र आले पाहिजे, इथपर्यंत वाद-संवाद झडत आहेत. कारण एमआयएमचे हैदराबादेतील आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी ‘१५ मिनिटांसाठी पोलिस हटवा आणि पाहा २५ कोटी मुसलमान काय करू शकतात ते’, असे भडक आणि गंभीर विधान जाहीर सभेत केले होते. जुन्या हैदराबाद राज्यातील रझाकारांचा जन्मदाता रझवी याने स्थापन केलेला हा पक्ष असल्यामुळे रझाकारांचीच मनोवृत्ती या पक्षाच्या प्रमुखांची आहे, असेही म्हटले जाते. त्याची शहानिशा करण्याची आणि भविष्य वर्तवण्याची ही जागा नाही. अचानक हा पक्ष महाराष्ट्रात दोन आमदार निवडून आणतो आणि १४ जागांवर काट्याची लढत कशी देतो, यामागचे गुपित आपण जाणून घेतले पाहिजे, असे मला वाटते.

या निवडणुकीत मुस्लिम मतदार ज्या प्रमाणात ‘एमआयएम’कडे आकर्षित झाला, ते महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मुस्लिम नेत्यांनाही धक्का देणारे आहे. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मुस्लिम नेते या निकालांनी हादरले आहेत. कारण, मुस्लिमांची मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय कुठेच जाणार नाहीत, अशी त्यांची आतापर्यंतची धारणा होती. त्या धारणेला या निकालांनी हादरा दिला आहे. समाजवादी पक्षाची अवस्थाही या दोन पक्षांपेक्षा काही फार वेगळी नाही. याचं कारण मुस्लिम मतदार हिंदुत्ववादी पक्षांना मतदान करणार नाही, अशी त्यांना खात्री होती. हिंदुत्ववादी पक्षांना नाही करणार तर जाणार कुठे? अशा भ्रमात हे तिन्ही पक्ष राहिले आणि एमआयएमने संधी साधली. या पक्षाने भडक भाषणं देऊन मुस्लिमांतील तरुण मुलांना आकर्षित केलं आणि म्हणून त्यांना इतकी मतं मिळालीत, असा समज काही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही बाब पूर्णसत्य मुळीच नाही. त्याहीपेक्षा वस्तुस्थिती फार वेगळी आहे आणि ती राजकारण समजून घेऊ इच्छिणार्‍यांनी अवश्य जाणून घेतली पाहिजे.
भडक भाषण देऊन ‘एमआयएम’ने इतकी मते घेतली असतील, तर तशीच भाषणं करण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाला कधीच का नाहीत इतकी मतं मिळू शकली? या प्रश्नाचे उत्तर हा युक्तिवाद करणार्‍यांना द्यावे लागेल. याचा अर्थ, एमआयएमचे नेते भडक भाषण करीत नाहीत, असा होत नाही. आमदार अकबरोद्दीन ओवेसींच्या अशा भाषणाचा उल्लेख वर आलेलाच आहे. तरीही मुस्लिम मतदार त्यांच्या तसल्या भाषणांनी त्यांच्याकडे आकर्षित झाला असेल, हे मला पटत नाही. खासदार असदोद्दीन ओवेसी यांची विधानसभा निवडणुकीच्या वेळची औरंगाबादेतील भाषणं पाहिली, तर त्यात एकही शब्द त्यांनी हिंदूंच्या विरोधात काढलेला नाही.
१० टक्क्यांपेक्षाही कमी वेळ त्यांनी शिवसेना आणि भाजपवर बोलण्यात घालवला आणि ६० ते ६५ टक्के वेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यासाठी दिला. २५ ते ३० टक्के वेळ त्यांनी ‘एमआयएम’ची कार्यपद्धती समजावून सांगण्यासाठी दिला, हे त्यांच्या भाषणांचं वैशिष्ट्य होतं. ‘एमआयएम’तर्फे हैदराबाद शहरात रोज जनता दरबार घेतला जातो. तिथे येणार्‍या तक्रारींचा लगेच निपटारा केला जातो, हे ते आवर्जू्न सांगत होते. पक्षाने हैदराबाद शहरात उभ्या केलेल्या सामाजिक कार्याची मािहती देत होते. भडक भाषणांच्या आधारे एमआयएमने मते घेतलीत, असे म्हणणार्‍या किती जणांनी त्यांचा हा प्रचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल, याविषयी शंकाच आहे.

‘एमआयएम’चे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी पक्षवाढीसाठी जे काही नियोजनबद्ध काम चालवले आहे, ते आजच्या राजकीय परिस्थितीत नीट समजून घेतले पाहिजे. अनेकांना आवडणार नाही आणि काहींना धक्काही बसेल; पण ओवेसी यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर नजर टाकली, तर भाजपचे नेते नरेंद्र मोदी आणि ओवेसी यांच्या निवडणूक नियोजनात अनेक साम्यस्थळे आहेत, हे मला सांगितलेच पाहिजे. ही या दोन नेत्यांची तुलना नाही आणि एमआयएम अथवा त्यांच्या नेत्यांचे उदात्तीकरणही नक्कीच नाही. राजकारणातील यशाचा एक हमखास मार्ग तयार होत असल्याकडे हा अंगुलिनिर्देश आहे. यशाचा एक राजमार्गच मोदींनी देशातील राजकारणाला दिला आहे. त्याच मार्गाने ओवेसीही प्रवास करीत आहेत, आणि तेही मोदींइतके नसले तरी यशस्वी होत आहेत, हे आपल्याला दिसतेच आहे. म्हणूनच या मार्गाचा अभ्यास करण्याची, तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या पक्षाच्या कार्यपद्धतीकडे, मतदारांना आकर्षित करण्याच्या शैलीकडे आपण लक्ष ठेवलेच पाहिजे. काय आहेत मोदी आणि ओवेसी यांच्या कार्यपद्धतीतील साम्यस्थळे? यावर आपण पुढच्या भागात सविस्तर प्रकाश टाकू.
deepakpatwe@gmail.com