शतकानुशतके घट्ट मुळे धरून असलेल्या जातिव्यवस्थेला सुरुंग लावण्याचे, ती नष्ट करण्याचे आजवर अनेक जाणीवपूर्वक प्रयत्न झाले, परंतु कधी प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या दबावामुळे तर कधी राजकीय व्यवस्थेच्या गरजेमुळे जातिभेदाच्या चौकटी गळून पडण्याऐवजी अधिकाधिक भक्कम होत गेल्या. याच भक्कम होत गेलेल्या चौकटींनी समाजाच्या एका वर्गात वृथा अभिमान जागवला, तर एका वर्गाला अक्षम्य असा न्यूनगंडही दिला.
जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जातजाणीव ठळक होत चालल्याचे वास्तव कायम असताना, जेथे प्रथम एखाद्याला जातीची जाणीव होते वा करून दिली जाते, त्या शाळेच्या दाखल्यावरूनच जातीचा उल्लेख गाळला जावा, अशा आशयाचे विधान भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आणि जातिअंताच्या व अनुसूचित जाती-जमातींना राजकीय आरक्षण नाकारण्याच्या चर्चेला नव्याने धग मिळाली. यानिमित्त हरी नरके, आनंदराज आंबेडकर, किशोर ढमाले, प्रा. अविनाश डोळस यांना बोलते केले आहे, ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी अशोक अडसूळ यांनी. सोबत सुहास सोनवणे यांचा जातिव्यवस्थेशी निगडित मुद्द्यांचा ऊहापोह करणारा लेख...