आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाण्याशिवाय धुळवड कशी साजरी करणार, असा प्रश्न सध्या दुष्काळाच्या परिस्थितीत कित्येकांना सतावत असेलच; पण काळजी करू नका. महाराष्ट्रातील गावोगावच्या दुष्काळाला गोळी मारत पाण्याची मनसोक्त ‘होळी’ साजरी करायची, याचे उदाहरण आसाराम बापूंच्या भक्तांना मिळाले असेलच. लोकांना प्यायला पाणी नसले म्हणून काय झाले? पोरींवर पाण्याचे फुगे फोडण्याचा वर्षभरातला एकमेव अधिकार रोडरोमिओंना मिळतो, त्यामुळे तो तसाच अबाधित राहणार आहे. एरवी टीव्हीवाल्यांच्या दांडक्यांवर दुष्काळाच्या बाबतीत गळा काढणा-या सेलिब्रिटीजची रंगपंचमी पाण्याची नासाडी नाही तर ‘इव्हेंट’ ठरतो. मराठी सेलिब्रिटीज, मालिकांच्या मलिका, हिंदी सेलिब्रिटीज यांचीही रंगपंचमी यंदा सुखरूप पार पडणार आहे. उलट रंगपंचमीच्या क्लृप्त्या लढवण्यासाठी चॅनल्सनी लाखो रुपयांची ‘होळी’ करून पाण्याची ‘होळी’ कशी करावी, याबाबत प्लॅनिंग करण्यासाठी प्रसिद्धिप्रमुखांची फळी नेमली आहे. पाइपलाइनमधून वाया जाणारे लाखो लिटर पाणी कमी वाटते की काय, म्हणून पाणी वाया घालवण्याच्या मानवनिर्मित सणाच्या नावाने बोंब ठोकण्याची गरज वाटावी अशी परिस्थिती आहे. होळीबहाद्दर मात्र यंदाही धूमधडाक्यात धुळवड साजरी करणार!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.