केवळ साक्षीभाव हीच खरी साधना असून फक्त साक्षीभावातच ज्ञान प्रकटत असते. कारण ज्ञानाचा स्वभावच साक्षीभाव आहे, ज्ञान आणि साक्षीभाव या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत.
कोणत्याही गोष्टीचे आकलन तीन टप्प्यात होत असते. प्रथम साक्षीभावाची गोष्ट कानावर पडावी लागते. फक्त साक्षीभावाचे महत्व ऐकल्याने, जे ज्ञान होते, त्याला ‘श्रुतमय प्रज्ञा’ म्हणतात. मग त्यानंतर त्या ऐकीव गोष्टीचे योग्यरीतीने चिंतन झाले की, जे ज्ञान होते, त्याला ‘चिंतनमय प्रज्ञा’ म्हणतात, तर त्यानंतर साक्षीभावात मनाचा निरास घडून, त्या गोष्टीचे जेव्हा संपूर्ण आकलन अंतरंगात होऊन प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुभूती येते, तेव्हा जे ज्ञान होते, त्याला ‘भावनामय प्रज्ञा’ असे म्हणतात.
आपण स्वतःच ज्ञानस्वरुप, जाणीवस्वरुप, ब्रह्मांडस्वरुप, विश्वस्वरुप असल्याची अनुभूती येणे, हे खरे सत्य ज्ञान असते, बाकी सर्व ऐकीव, वाचीव, शाब्दिक ज्ञान असते. अपरोक्ष ज्ञान झाल्यावरच माणसाच्या आचरणात ते ज्ञान उतरत असते, केवळ पुस्तकी, शाब्दिक ज्ञानाने माणसाचे आचरण पूर्णपणे बदलत नसते. केवळ शाब्दिक ज्ञान असलेली व्यक्ती वेळ येताच विकारांच्या विळख्यात अडकत असते. अपरोक्ष अनुभूती असलेली व्यक्तीच कोणत्याही षडविकारात अडकत नसते.
जो पर्यंत मन प्रक्रिया कार्यरत असते, तोपर्यंत विचार सुरुच असतात. विचार सुरु असले की, भवचक्र सुरु असते. मन आणि विचारांचा साक्षीभावात निरास, हे आत्मज्ञानाचे सूत्र आहे. मनात जोपर्यंत कोणता ना कोणता अनुभव सुरु असतो, त्या अनुभवाचे मूल्यांकन मनात सुरु असते, किंवा जोपर्यंत त्या अनुभवाविषयी कोणती ना कोणती प्रतिक्रिया सुरु असते, तोपर्यंत भवचक्र सुरुच असते. मनात सुरु असलेले अनुभवाचे मूल्यांकन, अनुभवाविषयी प्रतिक्रिया, अनुभवांविषयीची तुलना सुरु असणे, म्हणजे भवचक्र सुरु असणे असते. हे मूल्यांकन, प्रतिक्रिया, तुलना हे मनाचे कार्य असून, या तीन गोष्टींचा संपूर्ण निरास मनप्रक्रियेच्या समजेतून झाला, तर साक्षीभावाची अवस्था निर्माण होत असते. खरी साक्षीभावाची अवस्था निर्माण झाली की जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तूर्या असा प्रवास होऊन संपूर्ण आस्तित्वाचा खुलासा अंतरंगात होत असतो. यालाच आत्मज्ञान अथवा आत्मसाक्षात्कार म्हणतात.
केवळ साक्षीभावात ज्ञान प्रकटत असते. कोणतीही कर्मकांड, कोणतीही साधना, कोणतीही स्तुती, कोणताही संकल्प, कोणतीही महत्वाकांक्षा, कोणताही जप, कोणताही मंत्र, कोणताही मनोनिश्चय, कोणताही प्रयत्न, कोणतीही शारिरीक मनासिक अथवा शाब्दिक कृती, या ज्ञानापर्यंत पोहचत नसते. या सर्व बाबींचा निरास अथवा समजेतून त्याग घडला असता, जी सजग निष्काम अवस्था प्रकटते त्या साक्षीभावाच्या अवस्थेत ज्ञानाचे प्रकटन होत असते.
जे मन, विचार, तर्क, बुद्धी, भावभावना, इच्छा, संकल्प, तुलना, प्रतिक्रिया, मूल्यांकन, इंद्रियानुभूती, विकार यांच्यात अडकलेले असते, या गोष्टींशी ज्या मनाला तादात्म्य असते, त्या मनात आत्मज्ञान कधीच प्रकटत नाही, हे सर्वांना समजावून घेणे गरजेचे आहे. सकाम मनाला कधीही ज्ञान होत नसते. आपल्या सर्व साधना, विधी, जप, तप, पूजा, यज्ञ, दान, प्रार्थना, उपवास हे सर्व सकामच असतात, म्हणून आपल्याला कधीही ज्ञान होत नाही. माऊली ज्ञानेश्वरीत सातव्या अध्यायात ओवी क्रमांक ९९ ते १०२ मध्ये स्पष्टपणे सांगते की,
जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाचिया झुळका चुकवुनि
अनुरागाचा निरु ताऊनि, पाणीढाळू ||९९||
जया ऐक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा
मग निवृत्तीचिया पैलतीरा, झेपावले जे ||१००||
जे उपरतीचां वावी सेलत, सोहंभावाचेनि थावे पेलत
मग निघाले अनकळीत, निवृत्ती तटी ||१०१||
येणे उपाये मज भजले, तेच माझी माया तरले
परि ऐसे भक्त विपाईले, बहुवस नाही ||१०२||
ज्ञानेश्वरीत आणि ‘अमृतानुभव’ या ग्रंथात हे सर्व फार सुंदरपणे, स्पष्टपणे ठिकठिकाणी सांगितले आहे. खरे तर मनाची सकामता हाच ज्ञानाच्या आड येणारा खरा अडसर आहे. ज्या क्षणी मन संपूर्ण शांत व निष्काम होते, जेव्हा मनातील विचार पूर्णपणे थांबतात, त्या साक्षीभावाच्या अवस्थेत ज्ञानाचे प्रकटन होत असते. आपण सगळे मनाच्या सापळ्यात अडकलेले असून, मनाची व्यर्थता आपल्याला न समजल्याने आपण मन, विचार, बुद्धी तर्क, इंद्रियनुभूती, कामना, संकल्प, आशा, यांच्या जाळ्यात अखंडपणे वावरत असतो. म्हणून आपल्याला कधीच ज्ञान होत नसते. मन इंद्रिय, संकल्प, विचार, अनुभव, आशा, कामना यांची व्यर्थता जाणणे, हे खऱ्या साधकाचे प्रथम कर्तव्य आहे. ज्ञानेश्वरीत अर्जुनाला पानापानावर भगवान कृष्ण हीच गोष्ट सांगतांना आढळतात. ते पुन्हा पुन्हा सांगतात, हे अर्जुना तू या मन आणि इंद्रियाच्या नादी लागू नकोस. मन, विचार आणि इंद्रिय ही भ्रम निर्माण करणारी यंत्रणा आहे. सर्व इंद्रियानुभूती, या भ्रम आहेत. सर्व अनुभव हे द्वैतातले अनुभव असतात. द्वैत हेच भ्रमाचे मूळ आहे. मी वेगळा व जग वेगळे, असे भासणे हाच मूळ भ्रम आहे. जोपर्यंत हा मीपणाचा, मीपण हे वेगळे असण्याचा भ्रम संपत नाही, जगाशी आपले एकत्व अंतरंगात उमजत नाही तोपर्यंत अहंपणाचा पर्यायाने दुःखाचा अंत होत नसतो. जोपर्यंत मन प्रक्रियेच्या बोधातून, समजेतून मन पूर्णपणे सजग, निष्काम होत नाही. तोपर्यंत ते ज्ञानाला प्राप्त होत नाही. केवळ साक्षीभाव हीच खरी साधना असून, फक्त साक्षीभावातच ज्ञान प्रकटत असते. कारण ज्ञानाचा स्वभावच साक्षीभाव आहे, ज्ञान आणि साक्षीभाव या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मन हे त्रिगुणाच्या अधीन असून त्रिगुणातीत होण्याचा मार्ग केवळ साक्षीभाव आहे. विचार एकतर सकारात्मक असतो किंवा नकारात्मक असतो. परंतु विचार सकारात्मक असो की नकारात्मक दोन्ही विचार भवचक्राच्याच बंधनात असतात, म्हणूनच माऊली म्हणते की,” हे अर्जुना तू पापपुण्याच्या पलीकडे जा, पाप आणि पुण्य हे द्वैत आहे. पाप लोखंडाची बेडी आहे, तर पुण्य सोन्याची बेडी आहे. शेवटी दोन्ही बेड्याच आहेत. भावार्थ, ज्ञानेश्वरीत नवव्या अध्यायात भगवंताने म्हटले आहे की,
“ज्या कर्माच्याकारणे घडे मजसी दुरावणे,
तया जो पुण्य म्हणे, झडो जीभ त्याची.”
सकारात्मक विचार म्हणजे, कार पुढच्या दिशेला चालवणे, तर नकारात्मक विचार म्हणजे कार मागच्या दिशेला उलटी चालवणे. दोन्ही बाबतीत बॅटरी चार्जच होते, पुढे चालवा की मागे चालवा. विचार कोणताही असो ते बंधनच असते. केवळ विचारांचा संपूर्ण निरास हाच खरा मार्ग आहे. मनाच्या निरासालाच माऊलीने चारही वाचांचा निरास म्हटले आहे. कार जर जागीच तीन-चार महिने उभी ठेवली, तर कारची बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते. बॅटरी डिस्चार्ज करण्यासाठी काहीही प्रयत्न करण्याची गरज नसते, तसे मन डिस्चार्ज करण्यासाठी काहीही करण्याची गरज नसते. केवळ मनाचे जे सतत चार्जिंग सुरु असते, ते बंद होण्याची गरज आहे. मनाचे चार्जिंग बंद होण्यालाच ध्यान अथवा साक्षीभाव किंवा विपश्यना किंवा सामायिक म्हणतात. ध्यानात म्हणजेच साक्षीभावात म्हणजेच मनाच्या अतिनिष्काम अवस्थेतच, ज्ञानाचे प्रकटन होत असते. म्हणून अठराव्या अध्यायात माऊली म्हणते, मी अठराही अध्यायात एकच गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे निष्कामता. माऊली म्हणते, “ज्ञानमार्ग म्हणजेच निष्कामता, कर्म मार्गाने गेले तरी निष्काम कर्मातच ज्ञान प्रकटते व भक्तीमार्गाने गेलात तरी निष्काम भक्तीतच ज्ञान प्रकटते व योग मार्गही निष्काम असेल तरच ज्ञान होते.” ज्ञान, कर्म, भक्ती व योग हे चार वेगळे मार्ग नाहीत तर ते सर्व एकच होत हे ज्याला समजते त्यालाच गीता समजलेली असते. निष्कामता किंवा साक्षीभाव हीच ज्ञान प्रकटनाची खरी गुरुकिल्ली होय. ही गोष्ट जे खरोखर समजावून घेतील त्यासर्वांना ज्ञान होईल, यात तिळमात्र शंका नाही. अध्याय तीन २६८ ते २७१ मध्ये माऊली रागद्वेषाविषयी म्हणते,
यांचा पहिला कुरठा इंद्रिये, ऐथूनि प्रवृत्ति कर्माते विये |
आधी निर्दळूनि घाली तिये, सर्वथैव ||२६८||
मग मनाची धाव पारुषेल, आणि बुद्धीची सोडवण होईल |
ईतुकेनि थारा मोडेल, या पापियांचा ||२६९||
हे अंतरीहुनि जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले |
जैसे रश्मीवीण उरले, मृगजळ नाही ||२७०||
तैसे राग द्वेष जरी निमाले, ब्रह्मीचे स्वराज्य आले |
मग भोगी तो सुख आपुले, आपणची ||२७१||
वरील ओव्यांत माऊलीने सांगितले आहे की, अज्ञान, अविद्येकारण निर्माण होणारा मीपणाचा भास, त्या भासाकारणे निर्माण होणारा आसक्ती द्वेष, आवड निवड, प्रतिक्रिया, तुलना यामुळे षडविकारांची निर्मिती होऊन भवचक्र कार्यावित राहते म्हणून माऊली म्हणते, हे रागद्वेष जर शांत झाले तर मनाची धाव थांबते, अहंकार रुपी बुद्धीतून जीवाची सोडवण होते. अहंकाररुपी बुद्धीचा निरास झाला की, साक्षीभावात जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या म्हणजेच कॉन्शस, सबकॉन्शस, अनकॉन्शस, युनिव्हर्सल कॉन्शन्सनेस असा उलटा प्रवास अंतरंगात आपोआप घडून पिंडाचा, जीवभावाचा, सुषुप्तीचा, परिछिन्नतेचा, अहंकाराचा निरास होऊन स्वतः ब्रह्मस्वरुप, विश्वस्वरुप, आंतस्वरुप, ज्ञानस्वरुप, सत्यस्वरुप, तुर्यास्वरुप, वैश्विक जाणिवस्वरुप असल्याचे अपरोक्ष ज्ञान होते. यालाच संत आत्मसाक्षात्कार असे म्हणतात.