आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव व राहाता तालुक्याचे तहसीलदार तथा श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांची तीन वर्षे सेवा पूर्ण झालेली असताना त्यांची इतरत्र बदली केली नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन्ही अधिकार्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दोघांना 16 एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.
संजय भास्करराव काळे यांनी दोघांविरुद्ध जनहित याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार ज्या अधिकार्याने तीन वर्षे जिल्ह्यात 31 मे 2014 पर्यंत सेवा पूर्ण केली असेल, अशा अधिकार्याची व स्थानिक जिल्ह्याचा रहिवासी असलेल्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी जाधव यांनी तीन वर्षे सेवा पूर्ण केली आहे. राहाता तालुक्याचे तहसीलदार शिंदे यांनी जिल्ह्यात सहा वर्षे सेवा केली आहे. शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शासनाने सदानंद वाघ यांना 9 एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रियेतून मुक्त केले, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. याप्रकरणी खंडपीठाने नोटिसा बजावून 16 एप्रिल रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संजय काळे यांच्या वतीने अॅड. सतीश तळेकर व अॅड. किरण नगरकर यांनी बाजू मांडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.