औरंगाबाद- राजेंद्र दर्डा यांनी मतदारांकडे पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे जनतेत प्रचंड आक्रोश आहे. त्याउलट मोदींमुळे भाजपविषयी सहानुभूती असून दर्डांशी
आपली लढत नसून एमआयएमचे डॉ. गफार कादरी यांच्यासोबत आहे, असा दावा भाजप उमेदवार अतुल सावे यांनी केला. उद्योग, पर्यटन आणि शैक्षणिक विकासावर भर देऊ, असेही मत त्यांनी 'दिव्य मराठी' शी संवाद साधताना व्यक्त केले.
सध्या
नरेंद्र मोदींचा करिश्मा असून काँग्रेसच्या प्रचारफे-यांमधून 'मोदी..मोदी' अशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यांची कॉपी करत दर्डा यांनी अच्छा आदमीची जाहिरात केली, मात्र काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो टाळले. पंधरा वर्षे आमदार आणि मंत्री राहूनही त्यांना अच्छा आदमी असल्याबद्दल लोकांना पटवून का सांगावे लागते..? आपण मात्र विकासासाठी विविध क्षेत्रांतील ४० तज्ज्ञांची समिती स्थापन करू. महिला, युवकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच उद्योग, पर्यटन आणि शैक्षणिक विकासासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
विद्यमान आमदाराविषयी आक्रोश
दर्डांनी पाच वर्षांत मतदारांशी संपर्क ठेवला नाही, निधी आणला नाही, नाशिक- नगरच्या धरणांतील पाणी जायकवाडीत येऊ दिले जात नाही. मंत्री असूनही कॅबिनेटमध्ये आवाज उठवला नाही. गुंठेवारीचा प्रश्न शासनदरबारी मांडून तो सोडवला नाही. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत.
या कामांना प्राधान्य
1. सिडकोच्या घरांचा मालकी हक्क देणार.
2. गुंठेवारीत पायाभूत सुविधा देणार.
3. शहराभोवती रिंग रोडचे जाळे निर्माण करणार.
4. महिलांसाठी स्वतंत्र उद्योग उभारणार.
5. प्री एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग सेंटरद्वारे युवकांना मोफत प्रशिक्षण देणार.