धार्मिक अतिक्रमण हटवणे ही औरंगाबादसारख्या संवेदनशील शहरात अतिशय धोक्याची बाब ठरू शकते हे माहीत असताना मनपा, पोलिस यंत्रणा, महसूल खाते, जीटीएल यांनी संयुक्तपणे मोहीम आखत ती यशस्वी करून दाखवली.
गुरुवारी सायंकाळी मोहिमेचा आराखडा नक्की झाला आणि तो मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना सांगितला, पण मोहीम कुठून व कधी सुरू करायची याचा तपशील इतरांना ऐनवेळी कळवण्यात आला. मनपाच्या पथकांना वॉर्ड कार्यालयांत जमण्याचे सांगण्यात आले होते तर पोलिसांना रात्री पहाटेच्या मिशनसाठी तयार राहा, असे आदेश गेले. मनपा आयुक्त पहाटे दोन वाजेपर्यंत सारी यंत्रणा लावण्यात बिझी होते. मनपाच्या मोजक्याच अधिकार्यांना परफेक्ट वेळापत्रक माहीत होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास मोहिमेच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले. परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. महसूलचे कर्मचारी दोन्ही पथकांसोबत नोंदी घेत होते, तर अतिक्रमण काढताना विजेच्या संदर्भातील काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी जीटीएलचे कर्मचारी असा हा ताफा होता.
नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यामुळे ही मोहीम फत्ते झाली. यात काहीही कसूर राहू नये यासाठी पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह रात्रभर जागे होते. पहाटे साडेपाच वाजताच ते बाहेर पडले. लगोलग जिल्हाधिकारी विक्रम कुमार आणि मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे जॉइन झाले आणि मग त्यांनी प्रत्येक कारवाईस्थळाला भेट दिली. याशिवाय शहरात काय होत आहे यावर ते बारकाईने लक्ष ठेवून होते.