औरंगाबाद- बुलडाण्याहून मुंबईला परतताना औरंगाबाद विमानतळावर थांबलेले राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे अवघ्या एक कप चहासाठी अर्धा तास ताटकळले. मला विमानतळावरचा यंत्रात तयार होणारा नको, घरचा चहा हवा, असे त्यांनी एक तास आधी कळवले होते. परंतु कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना एका कपासाठी ताटकळावे लागले.
कार्यकर्त्यांनी धावाधाव करून विमानतळावरच घरच्यासारखा चहा करून त्यांच्या पुढ्यात ठेवला. चार बिस्किटांसह त्यांनी तो संपवला. तेव्हा उपस्थितांना हायसे वाटले.
तावडे सकाळी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथून विमानाने मुंबईला परतण्यासाठी ते विमानतळावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आमदार अतुल सावे, ज्ञानोबा मुंढे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे, नगरसेवक दिलीप थोरात कचरू घोडके आदी मंडळी विमानतळावर हजर होती. काही मोजक्या पत्रकारांना तेथे पाचारण करण्यात आले होते. माझा चहा कोठे, असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर एक कार्यकर्ता लगेच चहा घेऊन हजर झाला. तो साखरेचा चहा होता. मला बिनसाखरेचा चहा हवा, असे सांगत त्यांनी तो नाकारला. मग, यंत्राने तयार केलेला चहाही परत केला. तेव्हा आमदार सावे यांच्यासह उपस्थित सर्वांचेच चेहरे बघण्यासारखे झाले होते.