आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजदर संतुलित करण्याची गरज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कृषीसाठी एक रुपया, घरगुती वापरासाठी 3.85 व उद्योगासाठी 9 रुपये प्रतियुनिटप्रमाणे वीजदर आकारण्यात येतात. इतर देशांच्या तुलनेत हे दर सर्वाधिक आहेत. यात संतुलन राखणे आवश्यक असून विशेषत: औद्योगिक कंपन्या टिकवण्यासाठी वीजदर कमी करण्याची गरज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशचे 40 वे वार्षिक अधिवेशन रविवारी (27 जानेवारी) संत तुकाराम नाट्यगृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कल्याण काळे उपस्थित होते. टोपे म्हणाले, एमएसईबीची स्थापना 1960 मध्ये झाली. तेव्हा 750 मेगावॉट विजेचे उत्पादन व्हायचे. आज त्यात 20 पटीने वाढ झाली आहे. सध्या 13 हजार मेगावॉट विजेचे उत्पादन घेतले जाते. त्या वेळी 1 लाख 7 हजार ग्राहक होते. त्यामध्ये 200 पटीने वाढ होऊन 1 कोटी 95 लाख ग्राहकांची संख्या पोहोचली आहे. वीजनिर्मितीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. विजेच्या पुरवठय़ात साडेपाच हजार मेगावॉट वाढवण्याचा प्रयत्न आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत. तसेच साडेसहा हजार कोटींच्या पायाभूत आराखड्याच्या दुसर्‍या टप्प्याला शासनाची मंजुरी मिळाली आहे. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, संजय शिरसाट, महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, महापारेषणचे संचालक उत्तमराव झाल्टे, एसईए संघटनेचे अध्यक्ष बालमुकुंद सोमवंशी, शैलेंद्र दुबे, आशिष मेहता, रेखा जैस्वाल आदींची उपस्थिती होती.