औरंगाबाद - इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना रविवार दि. १८ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने शनिवारी ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजांच्या प्रवेशासाठी ५ जून पासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. यासाठी १७ जून ही विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता मुदत देण्यात आली होती. आज या प्रवेश नोंदणीसाठी अंतिम दिवस होता. परंतु जालना आणि अन्य ठिकाणांवर विद्यार्थ्यांची वाढती गर्दी आणि मागणीनुसार एक दिवस या नोंदणी प्रक्रियेस मुदत वाढ देण्यात आली आहे. यामुळे रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आता नोंदणी करता येणार आहे.
१९ जून रोजी इंजिनिअरिंची तत्पूर्ती गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येणार आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात ९० हजार तर शनिवारी सायंकाळपर्यंत औरंगाबाद विभागात १२ हजार ७६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सोमवारी तात्पूर्ती गुणवत्ता यादी जाहिर झाल्यानंतर २० व २१ जून रोजी विद्यार्थ्यांना आपले आक्षेप नोंदविता येतील. तर अंतिम गुणवत्ता यादी व रिक्त जागांचा तपशील ही २२ जून रोजी जाहिर होणार आहे. असे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या फेरीसाठी २३ ते २६ जून दरम्यान ऑप्शन फॉर्म भरता येईल. प्रथम फेरीसाठीचे जागा वाटप २८ तारखेला जाहिर करण्यात येणार आहे. यानंतर प्रवेश निश्चितीसाठी २९ जून ते ३ जुलै पर्यँत एआरसी सेंटरला जावून प्रवेश निश्चित करायचा आहे. ५ जुलै रोजी पहिल्या फेरी नंतरच्या राहिलेल्या रिक्त जागा ऑनलाइन जाहिर करण्यात येईल. दुसऱ्या फेरीसाठी ५ ते ८ जुलै रोजी अर्ज करता येतील. १० जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठीचे जागा वाटप करण्यात येईल. ११ ते १४ जुलै दरम्यान दुसऱ्या फेरीचे प्रवेश निश्चित करायचे आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची माहिती तिसऱ्या फेरीसाठी १६ जुलै रोजी ऑनलाइन जाहिर होतील.
१६ ते १९ जुलै दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्याना भरता येतील. तिसऱ्या फेरीसाठी जागांचे वाटप २१ जुलैला होईल. २२ ते २४ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या संस्थेत प्रवेश मिळाला आहे. त्या संस्थेत जावून प्रवेश घ्यायचा आहे.त्यासाठी २५ ते २९ जुलै पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. यंदा प्रवेशाच्या तीनच फेऱ्या असल्याने समुपदेशन फेरी नसले. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १ ऑगस्ट रोजी नियमित तासिकांना सुरुवात होणार आहे.