औरंगाबाद- १५० कोटींतून शहरातील रस्त्यांचे कामे होणार याची चर्चाच होती. शासनाकडून २७ जूनला १०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता, परंतु राजकीय वादात घोडे अडले होते. अखेर मंगळवारी सायंकाळी शासन निधी तसेच मनपाच्या तिजोरीतून ५२ कोटी रुपयांची डिफर कामे असे मिळून १५२ कोटी रुपयांच्या निविदा जारी झाल्या. यातून ५२ रस्ते होणार आहेत. सलग तीन दिवस सुट्या आल्याने निविदा प्रसिद्ध करता आल्या नाहीत. मंगळवारी कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने सकाळपासून निविदा वेबसाईटवर टाकण्यास सुरुवात झाली. अटी शर्ती अनेक असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
२५ दिवसांचा कालावधी
ठेकेदारांना निविदा भरण्यासाठी २५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या महिन्यात दिवाळीच्या सुट्या असल्याने नोव्हेंबरला २५ दिवस पूर्ण होतात. अर्थात ठेकेदारांनी प्रीबीड दरम्यान कालावधी वाढवून मागितला नाही तर नोव्हेंबरला निविदा उघडल्या जातील.
माझे काम मी केले, आता तुम्ही सज्ज राहा
पदावर विराजमान होताच रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून रस्त्यांची कामे करणार असे महापौर भगवान घडमोडे यांनी जाहीर केले होते. त्यांना फक्त ११ महिन्यांचा कालावधी मिळाला. शासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी निधी आणला आणि ५२ रस्त्यांसाठी निविदा जारी झाल्या. यावर बोलताना घडमोडे म्हणाले, शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी माझे काम केले, आता नागरिकांनी रस्त्यांच्या दर्जावर लक्ष ठेवावे. दर्जेदार कामांसाठी सजग नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे.
एकूण- ५२ रस्ते
- शासनाच्या १०० कोटींत २५ कोटींचे प्रत्येकी चार टप्पे करण्यात आले आहेत.
- मनपाच्या ५२ कोटींत ३० आणि २२ कोटींचे दोन टप्पे करण्यात आले आहेत.
असे होतील रस्ते
३१ रस्ते शासनाच्या १०० कोटींतून
२१ रस्ते मनपाच्या ५२ कोटींतून