औरंगाबाद - भक्ती, ज्ञान व कर्म ही भगवद्गीतेतील जीवनाची सूत्रे. पण तीच अमलात आणून व्यवसायातही यशोशिखर गाठता येते, हजारो लाेकांची क्षुधाशांती करत शेकडो हातांना रोजगार देता येतो हे दाखवून दिले निम्म्या भारतात लोकप्रिय ठरलेल्या गोली वडापावचे सीईओ व्यंकटेश अय्यर यांनी. १९ राज्यांत ३५० आऊटलेटद्वारे हा वडापाव लोकांच्या जिभेवर राज्य करताेय. एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी येथे आलेल्या व्यंकटेश यांनी यशोगाथा सांगितली. ती त्यांच्याच शब्दांत...
''माझा जन्म मुंबईचा. लहानपणापासून मराठी नाटक, मध्यमवर्गीय मराठी घरातले संस्कार. तमाम मुंबईकरांसारखी मलाही वडापावची आवड. एका बहुराष्ट्रीय कंपनीत वित्त विभागात काम करत असताना स्वत:चा व्यवसाय असावा असे वाटत होते. काहीतरी मार्ग दाखव असे साकडे परमेश्वराला घालत होतो. मार्ग मिळण्यासाठी भक्ती करत होतो. एके दिवशी मुंबईतील एक श्रीमंत व्यावसायिक गप्पा मारताना मला म्हणाले, पिझ्झा, बर्गर कितीही असले तरी भारतीयांना देशी पदार्थच पसंत पडतात. यावरून अन्नपदार्थ विक्रीचा व्यवसाय करावा असे विचार मनात घोळत राहिले. मग या विषयातील सखोल ज्ञान मिळवण्याच्या दिशेने माझे काम सुरू झाले. मुंबईतील आम आदमीचा वडापाव काॅर्पोरेट कल्चरमध्ये रुजवण्यासाठी किल्ली सापडली. पण तेवढ्याने भागणार नव्हते. प्रचंड मेहनत म्हणजे कर्म करावे लागणार होते. अक्षरश: झपाटल्यागत कामाला लागलो. १९९७ मध्ये प्रथम व्यवसाय करावा हा विचार मनात आला. २००४ मध्ये गोलीचे पहिले आऊटलेट कल्याणला सुरू झाले. सव्वा वर्षात १५ आऊटलेट झाले. आई-वडिलांनी विरोध केला, पण पत्नी खंबीरपणे पाठीशी होती.''
पुढील स्लाइडवर वाचा वडापावला गोलीच नाव का?