आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - आपण कुठे काम करतो, हे समजून घेऊन मुलींनी वागावे. परिस्थितीचा वेध नजरेने घ्यावा आणि योग्य पोशाख परिधान करावा, असे मत निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू’ अशी प्रतिमा निर्माण करणा-यांविरुद्ध महिलांनीच आवाज उठवला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध व तक्रार निवारण समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटनाच्या वेळी चपळगावकर म्हणाले की, मुलींना नजर ओळखू येते असे म्हणतात. त्याचा वापर केला पाहिजे. अभिनेता आमिर खान ‘आती क्या खंडाला’, म्हणतो आणि ती मुलगीही त्याच्यासोबत जाते, हे चुकीचे व अपमानास्पद आहे, असे का वाटत नाही? अनेक ठिकाणी मुलीच आमिरला हे गाणे म्हणण्याचा आग्रह करतात. संरक्षणासाठी मुलींच्या हाती शस्त्र देऊन काम भागणार नाही. त्यासाठी त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी आईची असते, असेही ते म्हणाले.
टाळी एका हाताने वाजत नाही
मुलींनी सातच्या आत घरात आले पाहिजे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी व्यक्त केले. तथापि, विपरीत घटनांना मुलीदेखील तेवढ्याच जबाबदार असतात, असे ते म्हणाले. टाळी एका हाताने वाजत नाही, या आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी पाश्चात्त्य लेखकाच्या ‘फ्लायर’ पुस्तकाचा संदर्भ दिला. नंतर मात्र कुलगुरूंनी माझ्या म्हणण्याचा महिलाविरोधी अर्थ नव्हता, असे सांगत शब्द मागे घेत असल्याचेही पत्रकारांना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.