औरंगाबाद- प्रकाश मेहता प्रकरणात लोकायुक्तांच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. मात्र लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री येत नाहीत. मुख्यमंत्र्यांचीही चौकशी होऊ शकते यामुळेच हे प्रकरण लोकायुक्तांकडे देण्यात आले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
चव्हाण म्हणाले की, हे शासन भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालत आहे. देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर मेहतांचा देखील राजीनामा घ्यावा लागेल. त्यामुळे दोन्ही प्रकरणे एकाच वेळी अंगावर येतील. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे घेतले नाहीत. हे सरकार मेहता व देसाई यांना वेगळा न्याय आणि खडसे यांना वेगळा न्याय देत आहे, असेही चव्हाण म्हणाले.
राणेंनाच विचारा : मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत येत नाहीत. मेहतांनी नस्तीमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लिहिल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना चौकशीला सामोरे जावे लागू नये, असा खटाटोप सुरू आहे. या प्रकरणात नारायण राणे स्वतंत्र भूमिका घेणार आहेत का, याबाबत खासदार चव्हाण यांना विचारले असता ते त्यांनाच विचारा, असे त्यांनी उत्तर दिले.
टंचाई सदृश परिस्थिती घोषित करा : मराठवाड्यात दोन महिन्यांपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे शासनाने पंचनाम्याची वाट पाहू नये. पिके गेली आहेत. त्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती घोषित करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.