औरंगाबाद - १९५९ मध्ये ५५ वर्षांच्या भाडेकरारावर कृषी विभागाला देण्यात आलेली हिमायत बाग परिसरातील एकर जागा आता पुन्हा मनपाच्या ताब्यात आली आहे. येत्या चार दिवसांत मनपा तेथे
आपल्या मालकी हक्काचे फलक लावणार असली तरी तेथे अतिक्रमणांचा धोका वाढला आहे.
नगरपालिका असतानाच्या काळात म्हणजे १९५९ मध्ये तत्कालीन नगरपालिकेने राज्य सरकारच्या कृषी विभागाला हिमायत बाग परिसरातील एकर जागा ५५ वर्षांच्या करारावर दिली होती. या कराराची मुदत या वर्षी संपली. त्यानंतर मनपाने कृषी विभागाशी पत्रव्यवहार करून ही जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली केल्या होत्या. त्याला आता यश आले असून आतापर्यंत गर्द वनराईने नटलेला हा भूखंड आता मनपाच्या ताब्यात आला आहे. या जागेची आज महापौर त्र्यंबक तुपे, उपायुक्त अयुब खान यांनी पाहणी केली. याबाबत महापौर तुपे म्हणाले की, कृषी विभागाने ही जागा खूप चांगली सांभाळली आहे. काही किरकोळ अतिक्रमणे वगळता जागा राखण्यात त्यांना यश आले आहे. आता येत्या आठवड्यात मनपा आपल्या मालकी हक्काबाबत ताबा घेतल्याबाबतचे फलक तेथे लावणार आहे.
वेदांतनगरचे घोडे अडलेलेच : जायकवाडीहूनऔरंगाबादपर्यंत पाइपलाइन टाकण्यासाठी जीवन प्राधिकरणाने मनपाकडून वेदांतनगरसारख्या मोक्याच्या जागी मोठा भूखंड घेतला होता. ती योजना केव्हाच पूर्ण झाली. त्या योजनेचे पाइप जीर्ण झाले. आता समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे, पण वेदांतनगरातील ती जागा जीवन प्राधिकरण काही सोडायला तयार नाही. याबाबत मनपाने ओरड झाली की नावापुरते पत्र देण्याचे काम तेवढे केले आहे; पण ती जागा अद्यापही मनपाच्या ताब्यात आलेली नाही.
अतिक्रमणांचा धोका
हिमायतबाग परिसरातील तब्बल एकर जागा मनपाच्या ताब्यात आली असली तरी आपल्या जागा सांभाळण्याचा मनपाचा लौकिक पाहता हा सोन्यासारखा भूखंड अतिक्रमणांमुळे गिळंकृत होण्याची भीती आहे. त्यामुळे या जागेचा वापर कसा करावा याबाबत मनपाने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.