आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्म हाच साथीदार लाभावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. पण धकाधकीचे जीवन, वेळेचा अभाव आणि वृक्षतोडीमुळे वडाच्या झाडांची रोडावलेली संख्या यावर महिलांनी एक वेगळा पर्याय शोधला आहे. तो म्हणजे वडाच्या बोन्सायचा. घरच्या वडाच्या बोन्सायची पूजा करून ही संस्कृती जपण्याचा आधुनिक प्रयत्न महिला करत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी करणार्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन अधिक धावपळीचे झाले आहे. त्यात अशा सणांच्या दिवशी महिलांची जास्त धावपळ होते. त्यामुळे पूजा, स्वयंपाक आणि इतर कामे करून नोकरी सांभाळणे त्यांना अधिक अवघड जाते. त्याचबरोबर शहरीकरणामुळे वडाच्या झाडांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.
पूर्वी प्रत्येक वसाहतीत असणारी झाडे आता मंदिरांमध्ये किंवा विशिष्ट ठिकाणीच आढळून येतात. त्यामुळे वडाच्या झाडाजवळ वटपौर्णिमेच्या दिवशी मोठी गर्दी असते. या सगळ्या कारणांमुळे काही महिलांना बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणे अवघड जाते. त्यावर त्यांनीच उपाय शोधला आहे. घरातच वडाचे बोन्साय आणून त्याची विधिवत पूजा करून या महिला परंपरा जपत आहेत. शहरातील स्वाती स्मार्त आणि त्यांच्या मैत्रिणींनी अशाच प्रकारे सोमवारी वटपौर्णिमेची पूजा केली.
भावना महत्त्वाच्या : बोन्साय असो किंवा वडाचे मोठे झाड, पूजा करताना मनामध्ये असणारा भाव महत्त्वाचा असतो. आजच्या दिवसाचे महत्त्व वडाच्या झाडाचे आहे. ते झाड कोणत्या आकाराचे आहे याला महत्त्व नाही. त्यामुळे या झाडांची मांगल्याचे प्रतीक मानून पूजा करत असल्याची प्रतिक्रिया या महिलांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.