औरंगाबाद- "अाई-बाबा,सॉरी, मला माफ करा... एका मवाल्याच्या त्रासाला कंटाळून जग सोडत आहे,' अशा आशयाची मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून एका १७ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जुलै रोजी बालाजीनगरात घडली. तरुणाला मंगळवारी पोलिसांनी पकडून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
वैजापूर तालुक्यातील एक युवती एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. ती बजरंग चौकात शिकवणीला जात असे. शिकवणीच्या वेळात संदीप विठ्ठलराव भसांडे( २९, रा.बालाजीनगर) हा तिचा पाठलाग करत असे. मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणून त्रास देत होता. त्याचे त्रास देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. त्यामुळे युवती घाबरून कधी कधी शिकवणीला जात नसे. तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलीला त्रासापासून वाचवण्यासाठी मुलीच्या पालकांनी तरुणाच्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगून मुलाला आवरण्याची विनंती केली. तरुणाने त्या वेळी मुलीसह तिच्या आई-वडिलांची क्षमा मागितली. आता प्रकरणावर पडदा पडला असे वाटले; पण माफी मागितल्याची सल मुलाच्या मनात होती.
दुसऱ्या दिवशी त्याने तिला गाठले आणि "सर्वांसमोर मला जाहीर माफी मागायला भाग पाडले' म्हणत तिला शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर तुझी बदनामी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. त्याच्या धमकीला घाबरून तरुणीने २७ जुलै रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममधील छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले.तपास जवाहरनगर ठाण्याचे पीएसआय एन. जी. पोमनाळकर करत आहेत.
चिठ्ठी सापडली
"त्याने मला खूप त्रास दिला आहे. मी त्याच्या त्रासाला कंटाळले आहे. आई-बाबा, सॉरी, मला माफ करा...' असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी तरुणीच्या बेडरूममध्ये पोलिसांना सापडली.